
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ गावांना पडला होता. आता हळूहळू स्थिती सामान्य होताना दिसत आहे. ब्रह्मपुरी आरमोरी हा मार्ग अद्याप बंद आहे. पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी गावातून छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना भीमा नदीपात्रात पूल नसल्यामुळे जीव मुठीत धरून भीमा नदी पार करण्यासाठी होडीतून वाघोली येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागत आहे. होडीतून धोकादायक प्रवास करत विद्यार्थ्यांना घ्यावे लागते शिक्षण. भीमा नदी पात्रात शासनाने विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी एक होडी ठेवली असून होडी चालवण्यासाठी शाळेतील शिपायाची नेमणूक केली आहे. मात्र शिपाई नसल्यावर गावातील एक महिला होडी चालवत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी धोकादाय प्रवास करत आहे.
पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक गुरनाम सिंग यांना पंजाबमधील रोपार येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना उत्तर प्रदेश आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली आहे.
1996 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आणि सध्या अर्जेंटिनामध्ये भारताचे राजदूत असलेले अजनीश कुमार यांची आता उरुग्वेमध्ये नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय राऊत यांच्या दिल्लीतील विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईतील आगामी बीएमसी निवडणुकीत एकत्र लढले तर इंडिया आघाडीत फूट पडेल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल. महायुती बीएमसी निवडणुका जिंकेल.”
गाजियाबादमध्ये त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या खटल्याबाबत क्रिकेटपटू यश दयालने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर यशने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गाजियाबादमधील इंदिरापुरम पोलिस स्टेशनमध्ये 6 जुलै रोजी यशविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. बीएनएसच्या कलम 69 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील विडा जिल्हा परिषद गटात विशिष्ट समाजाच्या गावांना बाहेर काढून काही विशिष्ट समाजाच्या गावांचा समावेश केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दत्तात्रय ठोंबरे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना एकत्र करणे म्हणजे चार पाच वाघ एकत्र करणं होय. गावागावात गट तटात शेतकरी विभागला आहे.आपल्या सभेला शेतकऱ्यांची गर्दी झाली तर फडणवीस स्वत: चालत येतील असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या होम टाऊनमधील परिस्थिती काही वेगळी नाही, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीगार साचले असून सर्वत्र घाण साचली आहे. कचऱ्याची दुर्गंधी पसरली असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कर्मचाऱ्याला निकृष्ठ अन्नावरुन मारहाण केलीय. हा प्रकार सध्या राज्यभर चर्चेत आहे. त्यांच्याच बुलढाणा मतदारसंघातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. “आमदार साहेब आपण उपहारगृहात ‘उत्कृष्ट’ डाळीसाठी झगडत असताना, तुमच्याच मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे… विशेष म्हणजे, रुग्णांसाठी जेथे जेवण बनवले जाते, त्या स्वयंपाकघराला लागूनच ही घाण साचली आहे त्यामुळे आमदार साहेब जरा याकडे ही लक्ष द्या” अशी विनंती नागरिकांनी केली आहे.
ठाण्यात राज्य विद्युत मंडळाच्या खाजगीकरनाच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन करण्यात आलं आहे. ठाणे शहर काँग्रेस शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.
एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर जेव्हा तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळवून जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी मधून समोर आला आहे. आदर्श मेश्राम असे आरोपीचे नाव असून, एका 28 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जळगावातील वेगवेगळ्या भागांत टवाळखोरी करणाऱ्या 48 जणांवर पोलिसांच्या दामिनी पथकाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 28 टवाळखोरांना ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी 23 जणांना पालकांसह न्यायालयात हजर राहून प्रत्येकी 1200 रुपये दंड भरावा लागणार आहे. तर 25 जणांना समज देऊन सोडून देण्यात आले.
जळगावात मद्यधुंद अवस्थेत चालक प्रवाशांनी भरलेली खाजगी बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने जळगावात काही तरुणांना कट मारला, त्यानंतर तरुणांनी पाठलाग करून खाजगी बस थांबवल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अहमदाबाद ते अमरावती अशी खाजगी बस जळगावातून जात होती, बस मध्ये तब्बल ४० पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी बसने तरुणांनी कट मारला, त्यानंतर तरुणांनी पाठलाग करून खाजगी बस थांबविली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात आणि या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, समाजकल्याण विभागाकडून भोजन आणि निर्वाह भत्ता यासाठी पाच हजार शंभर रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात, छत्रपती संभाजीनगर मध्ये असेच शिक्षण घेणारे 88 विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना मात्र पाच हजार शंभर ऐवजी दोन ते अडीच हजार रुपये दिले जाते असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे, याबाबत अनेक वेळा तक्रारी देऊनही कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
नाशिक जिल्हा परिषद महिला कर्मचारी छळ प्रकरणी जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडून चौकशी सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर केला जाईल. ही संपूर्ण बाब गोपनीय आहे त्यामुळे जास्त बोलता येणार नाही. निनावी तक्रार आली होती त्यानुसार चौकशी केली जात आहे
लासलगाव (नाशिक) सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. घोषणा होऊन अद्याप नाफेडची कांदा खरेदी नाही. नाफेडला जर कांदा खरेदी करायचा असेल तर तीन हजार रुपये क्विंटलने कांदा करावा म्हणजे शेतकर्यांना लाभ होईल.
गोपाळ काला गोड झाला..गोपाळाने गोड केला असे म्हणत आज गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत गोपाळ काल्याचा उत्सव पार पडला. आजच्या पोर्णिमेच्या गोपाळ काल्याने आषाढी यात्रेची सांगता झाली तसेच मानाच्या सात पालख्या श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी मंदिरात येतात. गुरु शिष्य भेटीची हजारो वर्षाची परंपरा श्री विठ्ठल मंदिरात आजही सुरू आहे.
शहापूरमध्ये मुख्याध्यापिकेने मुलींना विवस्त्र केल्याप्रकरणी सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी आवाज उठवला. त्यानंतर सदर मुख्याध्यापिकेला अटक केल्याची आणि पुढे कडक कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले.
विरोधकांनी मला शहाणपणा शिकवू नये, मला कसलाही पश्चाताप नाही. मारहाण केल्याशिवाय पर्याय नव्हता असे मत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मांडले.
मुंबईत ईस्टर्न फ्री-वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. चेंबूर ते वडाळापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत.
हैदराबादमध्ये ईडीकडून 29 सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा डग्गुबत्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सट्टेबाजीच्या अॅपशी संबंधित प्रकरणात हे गुन्हे दाखल झाले आहेत. हैदराबादच्या सायबराबाद पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
खासदार भुमरेंच्या भावजयसाठी मद्य परवान्याची जलद प्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप आहे. मद्य परवाना ट्रान्सफर प्रक्रिया वायूवेगात राबवल्याचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर आला आहे. त्यामुळे 2023 मधील प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे.
महाराष्ट्र विकासासंदर्भात एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली. दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई, महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणणं ही आमची जबाबदारी आहे, असंही सामंत म्हणाले.
आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणात अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांकडे अद्याप तक्रार दाखल नाही. मारहाण झालेली व्यक्ती तक्रार करण्यास इच्छुक नसल्याचं कळतंय. तर मी माफी मागणार नाही, असं गायकवाडांनी स्पष्ट केलं.
बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या गेटवरील मुख्य रस्त्यावर तिघांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही मिटर अंतरावर पोलिस अधीक्षक कार्यालय आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे. याच परिसरात बराच वेळ ही मारहाण सुरू होती. दरम्यान मारहाण करणारे कोण होते? मारहाण का झाली? याची माहिती मिळू शकली नाही. तर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झाल्याची माहिती मिळालेली नाही.
जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ज्या इमारतीत रुग्ण दाखल असतात, तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या इमारतीच्या मागील बाजूच्या खिडक्या आणि इतर बांधकाम पूर्णपणे जीर्ण झाले असून, काही भाग अक्षरशः कोसळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या तीन वर्षांपासून या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही, अद्याप ते झालेले नाही. या इमारतीमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत असल्याने, जर तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामविकास मंत्रालयाच्या नावाने बनावट शासन आदेश तयार करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अक्षय चिर्के नावाच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन चव्हाण यांनी याबाबत तक्रार केली आहे. ठेकेदाराने सादर केलेल्या बनावट आदेशानंतर बांधकाम विभागाने इतक्या घाईघाईने निविदा प्रक्रिया कशी पूर्ण केली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ज्यामुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील 2024 च्या खरीप हंगामातील पिक काढणी वेळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी जिल्ह्यातील 75 हजार 677 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपये मिळणार आहेत.यासाठी राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या शंभर कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर होणार आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत निहाय आरक्षण आज निश्चित केले जाणार आहे. 621 ग्रामपंचायत पैकी 312 ग्रामपंचायतींसाठी महिला सरपंच आरक्षित आहे. अनुसूचित जाती 100 अनुसूचित जमाती 13 इतर मागास प्रवर्ग 168 तर सर्वसाधारण 340 असे एकूण 621 ग्रामपंचायतची आज आरक्षण सोडत होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नद्यांना मोठ्या पूर असल्यामुळे तीन दिवसांपासून गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहे. तीन दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे मालवाहतूक वाहन, डिझेल पेट्रोल टँकचे वाहने खाजगी बसेस वाहतूक ठप्प पडलेली आहे.
ठाणे तहसील कार्यालय या कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ आणि दाखले घेण्यासाठी नागरिकांना आता पायपीट करावी लागणार. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मुख्य बाजारपेठेत ठाणे तहसीलदार कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोन्ही कार्यालयाच्या इमारती जुन्या व जीर्ण झाल्यामुळे त्यांच्या एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील सातव्या मजल्यावर तहसील कार्यालय स्थलांतरित.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तानाजी सावंत पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात सहभागी होतील. तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आलीय. निवडून आल्यापासून आठ महिन्यात मतदारसंघात तानाजी सावंत का नाहीत? याबाबत मात्र पत्रात एक शब्दही नाही. तानाजी सावंत यांची एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत.
आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस, त्यानिमित्त शेगावत संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केलीय. महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या हजारो भाविकांनी संतनगरीत आज गर्दी केलीय. यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची मांदियाळी असल्याचे पाहायला मिळते आहे.
पुणे पोलिसांचा अनधिकृत स्पा सेंटरवर कारवाईचा बडगा सुरूच. स्पा चालकांना पोलिसांची सक्त ताकीद. स्पा व्यतिरिक्त काही “वेगळं” सुरू केलं तर कारवाईला सामोरे जा, पोलिसांचा स्पा चालकांना इशारा. पुण्यातील विमान नगर, कल्याणी नगर, खराडी, बाणेर भागातील स्पा सेंटर वर पोलिसांची छापेमारी. काल बाणेर आणि विमानतळ परिसरात झालेल्या कारवाईनंतर आज सुद्धा पोलिसांचा ड्राईव्ह सुरू. काल दोन भागात झालेल्या कारवाई मध्ये 18 मुलींची सुटका करण्यात आली होती, ज्यामध्ये 10 पेक्षा अधिक मुली या परदेशी नागरिक.