
होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द झाली आहे. ‘IMA’च्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने यू-टर्न घेतला असून येत्या 15 जुलैपासून सुरू होणारी CCMMP नोंदणी थांबवली. वरळी सी फेसवर मरिन ड्राइव्हसारखा विहारपथ 15 जुलैपासून खुला होण्याची शक्यता आहे. प्रियदर्शनी पार्क ते हाजी अली आणि बडोदा पॅलेस ते वरळी सी फेस या दोन टप्प्यांतील काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले असून हाजी अली ते बडोदा पॅलेस टप्प्यात थोडी कामे बाकी असल्याने १५ जुलैला विहारपथ खुला करण्याचा पालिकेचा मानस आहे. धाराशिव-उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील शेतकरी सुरेश मगरे यांनी दुबार पेरणी करून देखील, पाऊस नसल्याने पाण्याविना सुकून चाललेल्या पाच एकर उडीद पिकावर रोटर फिरवलाय. संतप्त शेतकऱ्यानी शेतात उभे असलेले पाच एकर वरील उडिदचे पीक रोटर फिरवून भुईसपाट केली. पिक विमा योजनेकडे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आजपर्यंत केवळ 21 हजार 857 शेतकऱ्यांनीच विमा भरला. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ट्विट केले की, “ओडिशाच्या विकासासाठी त्यांच्या प्रेरणा आणि अढळ पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. याप्रसंगी ओडिशातील विविध विकासात्मक उपक्रम, भविष्यातील रणनीती, केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय आणि राज्याच्या एकूण प्रगतीला गती देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. समृद्ध ओडिशाचे आणि विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य एकत्रितपणे काम करण्यास वचनबद्ध आहेत.”
एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने एअर इंडिया विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपास अहवालावर एक निवेदन जारी केले आहे. असोसिएशनने म्हटले आहे की तपासाचा सूर आणि दिशा पायलटच्या चुकीकडे निर्देश करते. आम्ही ही धारणा पूर्णपणे नाकारतो आणि निष्पक्ष चौकशीचा आग्रह धरतो. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय किंवा माहितीशिवाय हा अहवाल माध्यमांना लीक करण्यात आला.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढील आठवड्यात तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी येथे ही माहिती दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी शनिवारी येथे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेची बैठक 15 जुलै रोजी तियानजिन येथे होणार आहे.
दिल्लीतील सीलमपूर भागात 3 मजली इमारत कोसळल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांना घर कोसळल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. 3 जणांना आधीच वाचवण्यात आले आहे, आणखी काही लोक गाडले जाण्याची शक्यता आहे.
जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे भारतातील पहिले शोरुम मुंबईमध्ये सुरु होणार आहे. याचे उद्घाटन 15 तारखेला होणार आहे. शोरूमसाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये चार हजार चौरस फूट भाडेपट्टी करार करण्यात आला आहे. मुंबईनंतर दुसरे शोरूम नवी दिल्ली येथे ओपन होणार आहे.
राजगड किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे किल्ला परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर, कार्यकर्ते, शिवप्रेमी, शासकीय अधिकारी यांच्याकडून राजगड किल्ला परिसरात असणाऱ्या खंडोबा माळ परिसरात फटाके फोडून, पेढे वाटत करण्यात आला आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, आमदार मांडेकर यांच्या हस्ते जागतिक वारसा स्थळ दर्शवणाऱ्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आलं.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त कसबा सांगाव मधील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुलांना धडे दिले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आचरणात आणा. तसेच त्यांनी अब्राहम लिंकन यांनी हेड मास्तरांना लिहिलेल्या पत्राचा अन्वयार्थही सांगितला.
भोर तालुक्यातील वेनवडी गावातील शेतकरी विश्वजीत चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत एक जंगली कोल्हा पडला होता. याबाबत गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वन विभागाला ही माहिती दिली. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने दोरी आणि इतर उपकरणांच्या सहाय्याने बचाव मोहीम राबवत कोल्ह्याला विहितून बाहेर काढत जीवदान दिले.
वैद्यनाथ बँक निवडणुकीत एकूण 71 नामनिर्देशन अर्ज दाखल
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. यशश्री मुंडे निवडणुकीच्या निमित्ताने आता पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे नंतर आता यशस्वी मुंडे यादेखील राजकारणात सक्रिय होणार काय़ अशी चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नाशिकमधील खड्डेमय रस्त्यांची पाहणी
शहरातील उद्योजकांनी घेतली होती मंत्री भुजबळांची भेट
शहरातील नागरिक आणि उद्योजक खड्डयांमुळे त्रस्त
अंबड परिसरातील रस्त्यांची भुजबळांकडून पाहाणी
तीन वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू
आजीला शोधायला गेला आणि पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला
दोन वर्षांपूर्वीच झालं होतं आईचं निधन, वडील मजुरीसाठी गेले होते हैदराबादला
चिमुकला आणि आजी दोघचं राहत होते घरी
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा रांगा
दर्यापूर शहरात खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पुरवली जातात शेतकऱ्यांना खते
4 तास रांगेत उभे राहिल्यानंतर शेतकऱ्यांना मिळतय युरिया खत
शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याने शेतकरी संतप्त
मोठ्या शेतमालकांना रांगेत न उभं राहता खत दिले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले, ‘१२ किल्ल्याबाबतचं जे स्थापत्य आहे, वेस्टर्न घाट, समुद्र, जंगल अशा नैसर्गिक विविधतेत हे स्थापत्य तयार करण्यात आले, दरवाजे दिसत नाही असे तयार करण्यात आले. अशा सर्व गोष्टी युनेस्को समोर ठेवल्या. वर्षभर त्यांचं डेलिगेशन आलं. त्यांनी व्हिजिट केली. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात एक डेलिगेशन युनेस्कोत गेलं. टेक्निकल सादरीकरण केलं. एकूण २० देश सदस्य, त्यांना मतदानाचा अधिकार. त्यांच्या दुतावासांसोबत मीही बोललो. परराष्ट्र मंत्रीही बोलले. आम्ही मोदींनाही भेटलो. तुम्ही नॉमिनेशन केले. मतदानाची प्रक्रिया आहे. २० देश आहेत. भारत सरकारने पुढाकार घ्या असं सांगितलं. त्या त्या देशाच्या सरकारशी चर्चा केली.’
नाशिकमधील उद्योजकांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. शहरातील नागरिक आणि उद्योजक खड्डयांनी त्रस्त झाले होते. अंबड परिसरातील रस्त्यांची छगन भुजबळ यांनी पाहणी केली.
नवी मुंबईतील विमानतळ कधी सुरु होणार याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘काही विमानतळावर एक एक किलोमीटर पायी चालावं लागतं. इथे ट्रॅव्हलेटर तयार करण्यात आलं आहे. देशातील सर्वात आधुनिक एअरपोर्ट तयार होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विमानतळ पूर्ण करण्याचं टार्गेट दिलं आहे. पंतप्रधानांचीही वेळ घेणार आहे. १३ ते १४ हजार कामगार रोज काम करत आहे. कामगारांची संख्या दुप्पट तिप्पट वाढवायला सांगितली आहे.’
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची धक्कादायक आकडेवारी समोर… कुपोषण निर्मूलनाचा गाजावाजा, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती भयावह… 170 तीव्र कुपोषित तर 2036 बालके मध्यम तीव्र कुपोषित… स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मेळघाटवर कुपोषणाचा डाग कायम….
सुरेश भालेराव असे पोलीस हवालदाराचे नाव… दुचाकी वरून प्रवास करत असताना डंपर ने दिली धडक… उपचारासाठी ताबडतोब खाजगी जुपिटर रुग्णांमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीने हलवण्यात आले… पायाला आणि पोटावर मार लागण्याचे प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती… डंपर चालक आणि डंपरला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..
जाफराबाद तालुक्यातील आळंद येथे काल सायंकाळी आणि मध्यरात्री वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावल्याने अंगणवाडी इमारतीवरील पत्रे उडून भिंत कोसळल्याची घटना घडलीय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून मध्यरात्री ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र अंगणवाडीचे, शैक्षणिक वस्तूसह इतर काही उपयोगी वास्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लहान बालकांना आता पावसाळ्यात बाहेर बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.त्यामुळे लवकरात लवकर या इमारतीचे काम व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे.
ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेच्या समारोप सभेला उपस्थित राहणार… येत्या 14 तारखेला यवतमाळ जिल्ह्यातील आंबोडा येथे सातबारा कोरा यात्रेची समारोप सभा…
श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील लोखंडी उड्डाण पुलात विद्युत करंट उतरला होता. उड्डाण पुलाच्या जवळून जाणारी इलेक्ट्रिक वायर तुटून उड्डाणपूलावर पडल्याने उड्डाणपुलात करंट उतरला होता. करंट लागून तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला. विठ्ठलाच्या दर्शन रांगेत भाविकांची संख्या कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांची तत्परता महावितरणच्या कर्मचार्यांनी वेळीच विद्युत पुरवठा खंडीत केला.
जालना जिल्ह्यात 2025 ते 30 या कालावधीमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे.त्यामुळे येत्या 15 जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठ तहसीलदारांनी आरक्षित करण्यात आलेल्या गावांची नावे जाहीर करून प्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार उंची वाढीचे काम सुरू केले आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे. राज्य सरकारने कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे याचे स्वागत करत महापूर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात या मागणीसाठी आज सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर कृष्णा नदीची ओटी भरून निदर्शने करण्यात आली.
नायगाव मध्ये सोसायटीत बॅडमिंटन खेळताना, शटल कॉक पहिल्या मजल्यावर गेला असता, तो काढताना काढताना ए.सी. च्या विजेचा शॅाक लागून दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सात ते साढे सात च्या दरम्यान घडली असून, सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आकाश संतोष साहू असं १५ वर्षीय मृत मुलाच नाव आहे. तो नायगांव च्या बीच कॅाम्प्लेक्स मध्ये राहत होता.
हिंगोली जिल्ह्यात 225 हून अधिक मशिदींवर अनाधिकृत लाऊडस्पीकर असल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. जिल्ह्यात फक्त 19 मशिदिंमध्ये लाऊडस्पीकर वापरण्याचे परवानगी किरीट सोमैया यांचे म्हणणं आहे. जिल्ह्यातील 136 मशिदिंना नोटिसा बजावण्यात आल्या आणि उर्वरित मशिदिंना नोटीस बजवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी दिल्याचं ट्विटमध्ये म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी काढलेल्या सातबारा कोरा पायदळ यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. बच्चू कडूंची यात्रा काल यवतमाळ जिल्ह्यातील द्वारवा तालुक्यातील तिवरा गावात मुक्कामाला होती.बच्चू कडू यांची यात्रा आज यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज तालुक्यातील तिवरा,धानोरा,चिरकुटा गावातून जाणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पापळ गावातून काल ही यात्रा निघाली होती.
संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती आहेत. ते महात्मा आहेत, ते संत आहेत. त्यांच्या संतगिरीचे पुरावे कोणी समोर आणले असतील तर फडणवीस यांनी आमच्यावर कारवाईचे उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे. एक मंत्री सिगारेटचे झुरके मारत, आक्षेपार्ह स्थितीत पैशांच्या बॅगासह बसलेला आहे. हे चित्र आमचे नाही, ही महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी काढलेल्या सातबारा कोरा करा पदयात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. बच्चू कडूंच्या या पदयात्रेने 95 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती असलेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. वार्ड क्रमांक पाचमध्ये एक महिला रुग्ण उपचार घेत आहे. या महिलेचे पती आणि भावांमध्ये वाद होऊन वार्डातच हाणामारीला सुरुवात झाली.
सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा तालुक्यातील डाळिंब या गावात शुक्रवारी रात्री उशिरा रस्ता क्रॉस करताना अपघात होऊन एकाचा मृत्यू झालाय. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी काही काळ हैदराबाद सोलापूर महामार्ग बंद करत काही वाहनांवर दगडफेक केली.
शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी जनसुरक्षा कायद्यावर टीका केली आहे. हा कायदा जनहितासाठी नाही तर भाजपसाठी आहे. हा भाजप सुरक्षा कायदा आहे. या कायद्याला आमचा विरोध असणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
‘सिंदूर पुला’वरील अर्धवट फुटपाथमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. ” मुख्य पूल सुरु, पण चालायला रस्ता नाही!” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अपघाताचा धोका वाढल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता आहे आणि त्यांनी लवकरात लवकर फुटपाथचे काम पूर्ण करण्याची मागणी करत आहेत.
समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्यावर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोटात गोळी लागल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
‘प्राडा’ची एक टीम लौकरच महाराष्ट्र दौरा करणार असून येत्या आठवड्यात ती राज्यात चर्चेसाठी येणार आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षांनी माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी काढलेल्या सातबारा कोरा कोरा पायदळ यात्रेचा आजचा सहावा दिवस असून बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पायदळ पदयात्रेने 95 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.
14 तारखेला यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथे बच्चू कडूंची जाहीर सभा राज्यभरातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.
पुण्यातील कात्रज परिसरात 7-8 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणावर तलवारी आणि कोयत्याने वार, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय.
कात्रज कोंढवा रोड परिसरात असणाऱ्या एसबीआय बँकेसमोर तरुणांचा राडा, वार केल्यानंतर पळून जाताना तरुणांनी हातात नाचवल्या तलवारी आणि कोयता.
ओंकार साबळे या जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आलं आहे.
12 जुलै 1961 सालीजी पुण्याला पाणीपुरवठा करणारे पानशेत धरण फुटले, या घटनेला 64 वर्षं पूर्ण झाली आहेत. पानशेत धरण फुटीची साक्ष देणारी पुण्यात पूररेषा, पानशेत धरणफुटीची साक्षीदार आजही तग धरुन उभी.
12 जुलैच्या त्या प्रलयाची भयावहता दर्शवणारी एक निशाणी अजूनही पुणेकरांनी जपून ठेवली आहे…
होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द. ‘IMA’च्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा यू-टर्न, येत्या 15 जुलैपासून सुरू होणारी CCMMP नोंदणी थांबवली. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तातडीने निर्णय मागे घेण्यात आला असून होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी उपचार करता येणार नाहीत.