
राज्यातील शेतकरी पुराने उद्धवस्त झाला असून खरीप पिके वाया गेली आहेत. अशात आता राज्याच्या शेतकऱ्यांची अवस्था पहाता राज्य सरकारने अडीच हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, ते पुरेसे नसल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, उगाच थातूरमातूर घोषणा करून जाऊ नये, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी हे ८ आणि ९ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत त्यांच्या हस्ते विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत, पण मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान कोणते विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहेत त्याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याचा लाभपूरग्रस्त शेतकऱ्यांना व्हायला हवा अशी मागणी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले की, “संपूर्ण मराठवाडा आजही चिखलात आणि पाण्यात आहेत. पिके, घरे, पशुधन तर गेलेच; पण जमीन साफ खरवडून गेली आहे. आणि त्यावर किमान दोन पिढ्या पीक घेता येणार नाही. ४० लाख शेतकरी, ६० लाख एकर शेतीला पुराचा फटका बसला असून पंतप्रधानांनी ‘पॅकेज’ची धूळफेक न करता हेक्टरी ५० हजार थेट मदत आणि कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी जाहीर करावी. पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आताच मदतीचा हात दिला नाही तर मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या तीन पिढ्या नष्ट होतील. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांतर्फे पंतप्रधानांना आपण हात जोडून नम्र विनंती करीत आहे की थातूरमातूर घोषणा न करता शेतकऱ्यांना जे हवे आहे ते द्यावे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.