तातडीने मुंबईला या…; देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचे सत्तारांना आदेश, संध्याकाळच्या बैठकीत काय घडणार?
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर गंभीर आरोप करणाऱ्या अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समन्स बजावला असून आज संध्याकाळी तातडीची बैठक बोलावली आहे.

विधानपरिषद निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यातच अब्दुल सत्तार यांनी भाजपने शिंदेंची शिवसेना संपवण्याचे काम केलं, अस आरोप केला होता. आता या विधानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
अब्दुल सत्तार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीत मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी अब्दुल सत्तार यांना तातडीच्या बैठकीसाठी मुंबईत बोलावले आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
भाजपकडून शिवसेना संपवण्याचे काम; सत्तारांचे खळबळजनक आरोप
छत्रपती संभाजीनगर-जालना जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपला सुटली असून, भाजपने येथून सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुंडके उडवण्याचे काम भाजप करत आहे. आमचा गुवाहाटीतील त्याग भाजप पूर्णपणे विसरली असून, त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकंच तोडलं आहे,” असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य सत्तारांनी केले होते.
तसेच, “जिल्ह्यात शिवसेनेत दोन भाग करून एका भागाला हाताशी धरायचे आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा, अशी खेळी खेळून जर आमचा मोठा भाऊ आम्हालाच संपवणार असेल, तर आमच्याकडे दुसरा इलाज नाही,” असा थेट संताप त्यांनी व्यक्त केला होता.
संध्याकाळच्या बैठकीत काय होणार?
अब्दुल सत्तार यांच्या या विधानांमुळे भाजप नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यापूर्वीच समीर सत्तार यांची बंडखोरी मागे कशी करून घ्यायची आणि अब्दुल सत्तारांची नाराजी कशी दूर करायची, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना थेट बैठकीला येण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे अब्दुल सत्तारांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का? समीर सत्तार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? की महायुतीमधील हे अंतर्गत युद्ध आणखी पेटणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
