सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट कधी घेणार? मोठी अपडेट समोर, उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं…
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? कधी घेणार? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
ओबीसी समाजाचं काही नुकसान न करता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता आपल्याला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करायच्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमची धोरणात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी परभणीच्या शेतकरी मेळाव्यावरून देखील नाराजी व्यक्त केली होती. यावर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतरी गैरसमज केला म्हणून त्यांच्या तोंडातून काही शब्द आले असतील. त्यांनी संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत असं बोलू नये, अशी विनंती देखील आम्ही त्यांना केली, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
मुद्दा असा आहे की काल एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणात सांगितलं, आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की मराठा समाजाचे प्रश्न सोडवणारा तळमळीचा माणूस हा मनोज जरांगे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणाच्या मनात आकस असण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु तिथे कधी जायचं कसं जायचं हे आम्ही ठरवू , मुद्दा असा आहे की शासन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसदर्भात सकारात्मक पाऊलं टाकत आहे. धोरणात्मक पद्धतीने निर्णय कसा घ्यायचा? यावर आज देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. या सर्व गोष्टींमध्ये आम्ही सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहोत, आम्ही कसे जाणार, काय जाणार हे आम्ही काही कालावधीमध्ये सांगू, असं यावेळी सामंत म्हणाले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे, शिष्टमंडळ कधी जाणार? मागण्या कधी पूर्ण होणार? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला होता. यावर बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की, मी काल देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील. त्यांनी जेव्हा आमच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांना स्वत:च्या तब्येतीची देखील काळजी घ्यायला सांगा, आणि तो निरोप आम्ही त्यांना दिला आहे. कारण आम्हाला देखील त्यांची काळजी आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या कशा मान्य करायच्या? कोणत्या पद्धतीने मान्य करायच्या? यावर चर्चा सुरू आहे, ते ठरण्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
