राज्यसभेची जागा भुजबळांना का मिळाली नाही? नेमका गेम कुठे झाला? बड्या नेत्यानं सांगितली इनसाईड स्टोरी
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे सध्या भुजबळ हे नाराज आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादीमधून मंत्री छगन भुजबळ यांचीच राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. परंतु ऐनवेळी भुजबळ यांचा पत्ता कट झाला आणि राजेंद्र जैन यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर संधी देण्यात आली. या निर्णयामुळे भुजबळ नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यसभेच्या शर्यतीमध्ये भुजबळ हे सर्वात आघाडीवर होते. त्यांची देखील राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. परंतु आपण जर राज्यसभेवर गेलो तर पुतण्या समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद मिळावं अशी भुजबळांची अट होती. त्यानंतर शेवटी हा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहोचला. राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत यावर चर्चा करू निर्णय कळवू असं फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवलं होतं.
दरम्यान त्यानंतर राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारणीची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ, राजेंद्र जैन आणि राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या नावावर चर्चा झाली आणि अखेर सर्वमताने राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांचं नाव निश्चित झालं. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शशिकांत शिंदे?
भुजबळ हे संघर्ष करणारे नेते आहेत. कदाचित दिल्लीमधून त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली नसेल, काय झालं माहीत नाही. असं सूचक वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी भुजबळांबद्दल बोलताना केलं आहे. ताकद असलेले नेते पवारसाहेबांसोबत होते, तेव्हा त्यांचा उपयोग केला गेला. शरद पवार यांनी अनेक लोकांना उभे केले, त्यांनी अनेकांना न्याय दिला. परंतु तो न्याय आता का मिळत नाही? याचा विचार त्यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. पवारसाहेबांना भेटून गेलेल्या लोकांचा फायदा होत आहे, अजून काही लोक भेटले तर फायदा होईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
