अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा, CJP निवडणुकीत काय भूमिका घेणार? सांगितला अॅक्शन प्लान
अभिजीत दीपके यांनी आगामी निवडणुकीतील भूमिकेवर महत्वाचं भाष्य केलं आहे. आम्हाला आता सुरू असलेल्या राजकारणाच्या पलीकडे जायचं असे, दीपके यांनी स्पष्ट केलं.

देशातील काही राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कॉक्रोच जनता पार्टी काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान अभिजीत दीपके यांनी एका मुलाखतीत राजकारणावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आम्ही आता मैदानात उतरलो आहोत. आता आम्ही विद्यार्थी आंदोलन कायम पेटत ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहेत, असे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीनंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला घेरलं आहे. अवघ्या काही दिवसांत त्यांच्या कॉक्रोच जनता पार्टीला चांगलीच पसंती मिळाली. या जंतरमंतरवरील आंदोलनामुळे अभिजीत दीपके हे देशभरात प्रसिद्ध झाले आहेत. नीट पेपरफुटीविरोधात अभिजीत दीपके आणि त्यांच्या टीमने जोरदार आंदोलन केलं. अभिजीत दीपके यांनी म्हटलं की, आम्ही भूमिका घेतल्यानंतर देशद्रोही सारख्या उपाधीमुळे दु:खी झालो होतो. माझे वकील आणि कुटुंबीयांनी भारतात न जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरही अमेरिकेतून भारतात परतण्याचा निर्णय घेतला’.
दीपके यांनी पुढे म्हटलं की, मोदी सरकार समर्थक माझ्यावर देशद्रोहीचा आरोप करू लागले, त्यावेळीच भारतात येण्याचा निर्णय घेतला. खरंतर परदेशात असताना सरकारने माझ्याबाजूने उभं राहिलं पाहिजे होते. परंतु या सर्व आरोपामुळे भारतात परतलो. कारण मला मी देशावर प्रेम करतो, हे सिद्ध करायचं होतं. मोदी सरकारला जसे हवे, तसं नाही’. नव्या आंदोलनावर दीपके म्हणाले, ‘आता आम्ही शाळा सुधारण्यासाठी नवी मोहीम हाती घेतली आहे. सरकारी शाळांची दयनीय अवस्था समोर आणत आहोत’. तर आगामी भूमिकेवर प्रश्न विचारल्यावर दीपके म्हणाले, ‘आम्हाला आंदोलन पक्षीय किंवा निवडणुकीच्या राजकारणापुरते मर्यादित ठेवायचं नाही. खरंतर भारतीय लोकांनी राजकारणाला केवळ निवडणूक आणि राजकीय पक्षापुरते मर्यादित केलं आहे. आम्हाला या पलीकडे जायचं आहे. आम्ही फक्त निवडणुका लढण्यासाठी आलो नाही. आमचं ध्येय हे बदल घडवण्याचं आहे. ज्यांना हक्क आणि कर्तव्ये समजतील, त्यांना सत्तेतील पक्षाला जबाबदार कसे धरायचे हे समजेल’.
