जंतरमंतरवर आरक्षणाच्या विरोधात आंदोलन, वातावरण तापलं; मोदी सरकारमधील 2 मंत्र्यांनी भूमिका केली स्पष्ट
देशात आरक्षणाच्या विरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलं. यावरून मोदी सरकारमधील दोन मंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन यशस्वी झालं. त्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर आरक्षणाच्या विरोधातही आंदोलन तापलं होतं. एका संघटनेने आरक्षणाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी काही आंदोलक जंतरमंतरवर आंदोलनासाठी उतरले. परंतु पोलिसांनी आंदोलन मोडीत काढल्याची माहिती मिळतेय. या आंदोलनामुळे देशात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि रामदास आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
देशात आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीवर मंत्री पासवान म्हणाले, ‘आरक्षणाविषयीचा गैरसमज पसरल्याने मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये नाराजी पसरू शकते. मोदी सरकारने आधीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांसाठी 10 टक्क्यांचं आरक्षण लागू केलं आहे, असेही पासवान यांनी स्पष्ट केलं.
आंदोलनाला तेजस्वी यादव यांचा पाठिंबा, चिराग पासवान म्हणाले…
पाटण्यातील विद्यार्थी आंदोलनाला तेजस्वी यादव यांनी पाठिंबा दिलाय. त्यावर पासवान म्हणाले, ‘बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात कामकाजादरम्यान उपस्थित राहून मुद्दे उपस्थित केले असते, तर अधिक चांगले झाले असते. आता उशीर झाला तरी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. ही चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. कोणालाही दुर्लक्षित करू नये. सगळ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा. त्यासाठी यादव यांनी प्रयत्न केला पाहिजे’.
आरक्षण हटवण्याची मागणी असंविधानिक – रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘काही लोक आरक्षण हटवण्याची मागणी करत आहे. आरक्षण हटवण्यासाठी सोशल मीडियावर अभियान चालवलं जात आहे. आंदोलकांकडून जंमरमंतरवर आंदोलन करून आरक्षण हटवण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर आरक्षण हटवणे किंवा सुधारणा आणण्याची मागणी केली जात आहे. परंतु आरक्षण हटवले जाऊ शकत नाही. आरक्षण आमचा संविधानिक अधिकार आहे’. दिल्लीच्या जंतरमंतरवरील आरक्षणविरोधी आंदोलनानंतर मोदी सरकारमधील दोन बड्या मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्याचे समोर आलं आहे.
