Explained: मराठी माणसाने दिल्लीला पुन्हा झुकवलं…अण्णा हजारेनंतर अभिजीत दिपके भिडला, असा गड जिंकला
Anna Hazare-Abhijeet Dipke Delhi Jantar Mantar: अखेर दिल्लीत मराठी माणसाने पुन्हा एकदा इतिहास रचला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या दशकात दिल्लीतील सत्ताधीशांना हादरा दिला होता. तर यावेळी नवीन दमाचा मराठी तरुण चेहरा अभिजीत दिपके यांनी सरकाला पळो की सळो करून सोडले. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच. सरकारला या आंदोलनापुढे झुकावे लागले.

CJP Protest Dharmendra Pradhan: ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असे नेहमी म्हटल्या जाते. मराठी माणसांनी दिल्लीचे तख्त अनेकदा हादरवलेच नाही तर सत्ताधीशांना झुकवले याचे इतिहासात दाखले मिळतात. या एका तपात तर दिल्लीला मराठी माणसाने दोनदा झुकवल्याचे दिसून येते. तख्तालाही मोठे हादरे दिले. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची केंद्रीय सत्ताकारणात पुन्हा एंट्री झाली. तर आता अभिजीत दिपके यांच्या CJP च्या आंदोलनामुळे इतिहास घडला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. सरकार अगोदर त्याचा राजीनामा घेण्यास अनुकूल नव्हते. पण दिपके भिडले, लढले आणि जिंकले. अवघ्या दोन महिन्यांच्या त्यांच्या पक्षाने सिस्टिम हादरवली. भाजप सरकारला त्यांची मागणी मान्य करावी लागली.
अण्णा हजारे यांचे आंदोलन कशासाठी?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या दशकातील जंतरमंतरवरील आंदोलन देशभरातच नाही तर जगभरात गाजले. भ्रष्टाचारासह लोकपालासाठी त्यांनी आंदोलन केले. भ्रष्टाचाराविरोधात जंतरमंतरवर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठिंबा मिळाला होता. 2011 मध्ये आंदोलन पेटले होते. या आंदोलनातून आप पक्षाचा जन्म झाला. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि इतर अनेक नेते भारतीय राजकारणात आले. तत्कालीन काँग्रेस सरकारला हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळा बाबा रामदेवही प्रसिद्ध झाले. या आंदोलनाने देशभरात काहूर उठले.
या आंदोलनाचा फटका काँग्रेसला 2014 मधील निवडणुकीत बसला. भाजप केंद्रात सत्तास्थानी आली. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. अण्णा हजारांचे आंदोलनाला कुणाचा पाठिंबा होता आणि या आंदोलनामागे कोण होते यावरून आजही टीका होते. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराचा आरोप झाला. पण पुढे त्या आरोपाचे काय झाले हा सवाल आजही विचारला जातो. पण अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने देश एका मुद्दावर एकसंघ झाल्याचे दिसून आले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच काँग्रेस सत्तेबाहेर फेकल्या गेल्याचे मानले जाते.
आता अभिजीत दिपके मैदानात
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मे 2026 मध्ये एका सुनावणीदरम्यान बेरोजगार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांना उद्देशून, तरुणांना उद्देशून झुरळ (Cockroach) टिप्पणी केली. त्यानंतर एकच भडका उडाला. हे वक्तव्य तरुणांना उद्देशून नसल्याचे आणि चुकीचा अर्थ काढल्याची नाराजी सरन्यायाधीशांना व्यक्त केली. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी डिजिटल कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली. “होय, मी झुरळ आहे” या टॅगलाईन खाली या पक्षाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. 16 मे 2026 रोजी अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर ही व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू केली. बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटल्याच्या निषेधार्थ ही चळवळ सुरू झाली.
30 वर्षीय अभिजीत दिपके यांनी एक्सवर एक गुगल फॉर्म शेअर करून या पक्षात नोंदणी करण्याचे आवाहन केले. अवघ्या काही तासात या पक्षाच्या सर्व अकाऊंटला लाखोच नाही तर कोट्यवधी लोकांनी फॉलो केले. अभिजीत दिपके यांनी NEET प्रश्नपत्रिका फुटीविरोधात आवाज उठवला. त्यानंतर त्यांची सर्व सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक करण्यात आली. त्याविरोधात दिपके यांनी आवाज उठवला. त्यांनी नेटाने ही डिजिटल चळवळ सुरू ठेवली. त्यानंतर अमेरिकेतून भारतात येत असल्याचे सांगत त्यांनी पक्षाचे तीन प्रवक्तेही नेमले.
भारतात आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सहकाऱ्यांसह जंतरमंतरवर रीतसर परवानगी घेऊन NEET पेपरफुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी रेटली. त्यांच्या आंदोलनात नंतर पर्यायवरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी या आंदोलनात उडी घेतली. त्यांनी थेट आमरण उपोषणाची घोषणा केली. 26 दिवसांच्या त्यांच्या उपोषणामुळे या आंदोलनला धार आली. तर अभिजीत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाला जिवंत ठेवले. 20 जुलै या आंदोलनासाठी टर्निंग पॉईंट ठरला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केल्यानंतर, महिला आंदोलकांवर लाठ्या चालवल्यानंतर देश पेटून उठला. विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. देशभरात आंदोलनाची धग पोहचली आणि सरतेशेवटी आज थोड्यावेळापूर्वी अभिजीत दिपके यांच्या प्रयत्नांना यश आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण तरीही पुढील आंदोलनाची दिशा दिपके यांनी जाहीर केली आहे.
अभिजीत दिपके कोण?
अभिजीत दिपके या मराठमोळ्या चेहऱ्याने देशाच्या इतिहासात नाव कोरलं आहे. त्याच्या पक्षाच्या सोशल मीडिया खात्यावरील फॉलोअर्सच्या संख्येने विक्रम रचला होता. भाजप पक्षाच्या फॉलोअर्सपेक्षा संख्या अधिक होती. अभिजीत दिपके हा तसा मूळ हिंगोली जिल्ह्यातील आहे. हिंगोलीतील संतुक पिंपरी हे त्याचे मूळ गाव आहे. पण त्याचे वडील नोकरीनिमत्ताने छत्रपती संभाजीनगरीमधील बजाजनगर येथे स्थायिक झाले. त्याचे वडील हे सेवानिवृत्त अभियंते आहेत.
त्याने पत्रकारितेचे शिक्षण पुण्यातून घेतले. पुढे अमेरिकेतली बोस्टन विद्यापीठातून त्याने याच विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी त्याने मे 2026 मध्ये कॉक्रोच जनता पार्टी या डिजिटल पक्षाची स्थापन केली. अवघ्या दोन महिन्यात या पक्षाला तरुणाईचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. तर त्याच्या ऐका हाकेवर देशभरातील तरुण दिल्लीतील जंतरमंतरवर एकवटला. जी गोष्ट असाध्य मानली जात होती, ती साध्य झाली. दिपके यांच्या आंदोलनामुळे प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला. भाजप सरकार बॅकफुटवर गेले.
