कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची रूपरेषा ठरली; आंदोलकांसाठी सूचना जारी, वाचा A टू Z माहिती
उद्या दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे, दरम्यान आंदोलनाबाबत कॉकरोच जनता पार्टी कडून अधिकृत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला अभिजीत दीपके हे देखील उपस्थित राहणार आहेत.

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुण हे झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या या पक्षाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाईचे विविध प्रश्न घेऊन ही पार्टी मैदानात उतरली आहे. सुरुवातीला हा पक्ष फक्त सोशल मीडियावरच सक्रिय होता, मात्र आता शनिवारी 6 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. मराठी तरुण असलेल्या अभिजीत दीपके या तरुणाने या कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. या आंदोलनाला स्वत: अभिजीत दीपके हे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीकडून अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हटलंय?
देशभरातून आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आला आहे.
विमानतळावर गर्दी टाळण्यासाठी समर्थकांना विमानतळावर न येण्याचं आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे.
सर्व समर्थकांनी 6 जून रोजी सकाळी 9 वाजता संसद मार्ग पोलीस ठाण्यात जमावे.
अभिजीत दीपके विमानतळावरून थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचणार आहेत.
जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात येणार.
आंदोलन संविधानिक, लोकशाही मार्गाने आणि शांततेत पार पाडण्यावर भर.
सहभागी नागरिकांना शिस्त आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याचे आवाहन.
आंदोलनात राष्ट्रीय ध्वज आणि पुस्तके सोबत आणण्याचे आवाहन
कोणताही संशयास्पद किंवा गैरप्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश.
हवामानाचा विचार करून पाणी आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन.
ट्रोल, भडकावू व्यक्ती किंवा आंदोलन बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन.
आंदोलनाची माहिती इतर समर्थकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलं आहे.
दरम्यान या आंदोलनाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो? किती गर्दी होते? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
