पुलवामाचा पहिला बदला, मास्टरमाईंड गाजी राशीदचा खात्मा
पुलवामा (जम्मू-काश्मीर) : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पहिला बदला भारतीय जवानांनी घेतला आहे. जैश-ए-मोहम्मद या क्रूर दहशतवादी संघटनेचा कमांडर गाजी राशीद आणि कामरान या दोघांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. पुलवामातील पिंगलान येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीदरम्यान जवानांनी गाजी राशीद आणि कामरानला कंठस्नान घातला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीर येथील […]
पुलवामा (जम्मू-काश्मीर) : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पहिला बदला भारतीय जवानांनी घेतला आहे. जैश-ए-मोहम्मद या क्रूर दहशतवादी संघटनेचा कमांडर गाजी राशीद आणि कामरान या दोघांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. पुलवामातील पिंगलान येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीदरम्यान जवानांनी गाजी राशीद आणि कामरानला कंठस्नान घातला.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदने भ्याड दहशतवादी हल्ला केला. यात भारतीय लष्करातील 40 जवान शहीद झाले. त्यानंतर चार दिवसांनी आज पुन्हा पुलवामातच हल्ला करण्यात आला. यावेळी भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, एका इमारतीत दहशतवादी लपले होते. दोन्ही बाजूंनी चकमक सुरु झाली होती. या चकमकीत मेजर डी. एस. डोंडियाल यांच्यासह चार जवान शहीद झाले. तसेच, एका स्थानिक नागरिकाचाही यात मृत्यू झाला.
वाचा: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार, कोण आहे गाजी राशीद?
चकमक सुरु असतानाच, भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन सुरुच ठेवलं. ज्या इमारतीत दहशतवादी लपले होते, ती इमारतच जवानांनी उडवून दिली. भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर गाजी रशीद आणि कामरान या दोघांचा खात्मा करण्यात आला. यातील गाजी रशीद हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.
पुन्हा हल्ला, 5 जवान शहीद
पुलवामा हल्ल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे आज पुन्हा पुलवामातील पिंगलान परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 55 राष्ट्रीय रायफल्सचे 5 जवान शहीद झाले. मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सेवा राम, शिपाई अजय कुमार, शिपाई हरी सिंग हे जवान शहीद झाले. तसेच एका स्थानिक नागरिकाचाही चकमकीदरम्यान मृत्यू झाला.
चारच दिवसांपूर्वी पुलवामामध्ये हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात 14 फेब्रुवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान होते.