दिसला की लगेच टिपला… जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी घडामोड, Anti terror Operation, तीन दहशतवाद्यांचा जागीच खात्मा
Jammu Kashmir Anti terror Operation : जम्मू आणि काश्मीरमधून मोठी अपडेट समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर आता 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठी घडामोड घडत आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत गेल्या तीन दिवसांपासून धुमश्चक्री उडाली आहे. पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंड ठार झाले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. त्यात दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात जोरदार गोळीबार सुरू आहे. त्यात आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने टिपले आहे. त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. आणखी दोन दहशतवादी लपून बसल्याचे समोर आले आहे. त्यांचा शोध सुरूच आहे.
व्यापक शोध मोहीम
दहशतवाद्यांना शोधण्यासाठी व्यापक शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये हायटेक सर्व्हिलांस सिस्टिम, विशेष अर्धसैनिक दलाची तुकडी, जम्मू काश्मीर डीजीपी, लष्कराची 15 वीं कोर हे सर्व मिळून अँटी टेरर ऑपरेशनवर करडी नजर ठेऊन आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल ऑपेरशन ग्रुप, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांचे हे संयुक्त अभियान आहे. यामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यात येत आहे.
दक्षिण काश्मीरमध्ये दिसला की टिपला
एका पोलिस अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार गुप्त माहिती मिळाल्यानंतर 1 ऑगस्ट रोजीपासून दक्षिण काश्मीरमध्ये व्यापाक शोध मोहीम राबवण्यात आली. मोहीम सुरू होताच घाबरलेल्या दहशतवाद्यांनी अखल दाट जंगलात सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले.
जम्मू-काश्मीरमध्ये एका आठवड्यात तीन एनकाऊंटर
जम्मू काश्मीरमध्ये या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तिसऱ्यांदा चकमक उडाली. सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव राबवले. त्यात पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवादी सुलेमान, अफगान आणि जिब्रान यांना कंठस्नान घालण्यात आला. लष्कर-ए-तैयब्बाचा प्रमुख कमांडर सुलेमान हा पहलगाम आणि गगननीर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 29 जुलै रोजी संसदेत सांगितले की, या तीनही पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी बैसरन घाटीत या दहशतवाद्यांनी 26 निर्दोष पर्यटकांची हत्या केली होती. सैन्याकडून अजूनही शोध मोहीम सुरूच आहे.
