बंगालमधून सर्वात मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा राजीनामा देण्यास नकार, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले की, आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाचा वापर करून विजय मिळवला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी मी राजीनामा देणार नाही असं विधान केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
निवडणूक आयोगावर आरोप
ममता यांनी म्हटलं की, ‘आमची लढाई भाजपाशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. माझ्या आयुष्यात मी असा निवडणूक प्रकार कधीच पाहिला नाही. 2004 नंतर इतका अत्याचार मी पाहिलेला नाही. निवडणूक आयोग हा मुख्य खलनायक आहे. एसआयआरमुळे 90 लाख मतं काढून टाकली गेली. भाजपाने 100 जागांची लूट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मिळून आम्हाला हरवले. भाजपाने प्रत्येक प्रकारचा डावपेच वापरून आम्हाला पराभूत केले. भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर मारहाण केली.’
माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही
ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हटले की, ‘माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही निवडणूक हरलो नाही.’ राजभवनात जाणार का, असे विचारले असता ममता यांनी सांगितले की, ‘मी राजभवनात जाऊन राजीनामा देणार नाही. पक्षातील सदस्यांसोबत पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. आता मी भाजपाच्या अत्याचारांना अधिक सहन करणार नाही. मी रस्त्यावर उतरून लढा देईन.’
इंडिया आघाडी माझ्यासोबत
पुढे बोलताना ममता यांनी म्हटले की, ‘इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे. सोनिया गांधी यांनी मला फोन केला. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन आणि तेजस्वी यादव यांनीही मला फोन करून पाठिंबा दर्शवला. उद्या अखिलेश यादव येणार आहेत. आता मी स्वतंत्र पक्ष्यासारखी आहे. मला काही कामे करायची आहेत, पण आम्ही लढा सोडणार नाही.
भाजपवर गंभीर आरोप
भाजपवर आरोप करताना ममता म्हणाल्या की, ‘भाजपाने आमच्या लोकांवर अत्याचार सुरू केले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांवरही हल्ले झाले. भाजपाने त्यांना धमक्या दिल्या. भाजपाने आपल्या गुंडांच्या मदतीने हल्ले सुरू केले आहेत आणि पोलीस निष्क्रिय आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरही हल्ला केला. माझ्या पाठीवर आणि पोटावर लाथा मारण्यात आल्या.’
