Operation Sindoor : “भ्रमात राहू नका, पाकिस्तान अजून गुडघ्यावर आलेला नाही,” ऑपरेशन सिंदूरनंतर ओवैसी यांना म्हणायचे काय?
India Strike on Pakistan : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची जगात नाचक्की झाली आहे. दहशतवाद्यांच्या जीवावर जगणाऱ्या पाकिस्तानची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. तर एआयएमआयएमचे खासदार ओवेसी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान जगभरात दहशतवाद्यांना पोसत असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच पाकडे सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवत मुस्लिम देश आणि युरोपियन राष्ट्रात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर भारतीय परराष्ट्र खाते आणि लष्कराने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुराव्यांसह पाकड्यांना उघडे नागडे करण्यात आले. त्यातच भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकला सज्जड दम दिला आहे. जर भारतावर सैन्य कारवाई झाली तर भारत जबरदस्त उत्तर देईल हे सांगायला ते विसरले नाहीत. दरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानला कमकुवत करण्यासाठी हरएक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पाक हा विश्वासघातकी असल्याने त्याविषयी सुद्धा खबरदारी घेण्याचे सुतोवाच केले.
पाकिस्तान अजून गुडघ्यावर आला नाही
“आपल्या सर्वांना वाटत आहे की, पाकिस्तान गुडघ्यावर आला आहे. पण असे नाही. कोणत्याही भ्रमात राहू नका. अमेरिकेने हाफिज सईद याच्या मुलाला दहशतवादी घोषित केले आहे. पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी मारल्या गेले. त्यांच्या अंत्यविधी यात्रेत- नमाजे जनाजा मध्ये सईदचा मुलगा आला. त्याच्यासोबत पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि इतर अनेक दहशतवादी आल्याचे दिसून आले आहे. हाच पाकिस्तानचा खरा चेहरा आहे. त्यामुळे आपण कोणत्याही भ्रमात राहू नये. हे लोक अद्याप गुडघ्यावर आलेले नाहीत.” असे प्रांजळ मत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले.




बलुच आणि पठाण यांच्यावर पाकिस्तानमध्ये अन्याय
पाकिस्तानला पाणी सोडण्याविषयीच्या धोरणावर सुद्धा त्यांनी मत व्यक्त केले. धरण तयार करायला अजून काही दिवस लागू द्या पण पाकिस्तानला पाणी द्यायचे की नाही, याचा अधिकार आता भारताकडे असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानला हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन यांच्याशी काही एक घेणे देणे नाही. ते केवळ भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात त्यांचा हा मनसुबा आता कधीच यशस्वी होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. पाकिस्तान जर इतकाच चांगला असता तर तिथल्या बलुच आणि पठाण नागरिकांवर अन्याय का होत आहे, असा खणखणीत सवाल त्यांनी केला. पाकिस्तान जर आगळीक करणार असेल तर भारताचे सरकार पण आता मागे हटणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्यात येईल. भारत सरकार पूर्णपणे तयार असल्याचा थेट इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला.