संसद ते पुलवामा सर्वच हल्ल्यांचा हिशेब चुकता, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसुद अझहर याचा आंतकी लेखाजोखा
पाकिस्तानातील बहावलपूर येथील सुभान अल्लाह मशिदीवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात मसूद अझहरची मोठी बहीण आणि मेहुणे, पुतण्याची पत्नी आणि भाची तसेच ५ मुले ठार झाली आहेत.७ मार्च २०२४ रोजी भारताच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मोस्ट वॉन्टेड अतिरेकींच्या यादीत ५७ वर्षीय मसूद अझहरचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

भारताने पहलगाम हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेत जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेकी तळांना टार्गेट करणारी एअरस्ट्राईक केली आहे. बहालवलपूर येथील जैशच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात भारताला हव्या असलेल्या मसुद अझहर याच्या कुटुंबातील १० सदस्यांना आणि ४ जवळच्या सहकाऱ्यांना या हल्ल्यात ठार करण्यात आले आहे. अझहर भारताचा सर्वात मोस्ट वॉण्टेड अतिरेकी आहे. साल २००१ चा संसदेवरील हल्ला, २०१६ चा पठाणकोट हल्ला, उरी हल्ला साल २०१९ च्या पुलवामा हल्ल्यासाठी मसुद अझहर भारताला हवा आहे. संयुक्त राष्ट्र संघाने देखील त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केलेले आहे.
७ मेच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये आत शिरुन ९ अतिरेकी तळांवर एकाच वेळीच हल्लाबोल केला. मध्यरात्री १.०५ वाजता ही कारवाई सुरु झाली आणि १.३५ वाजता संपली.जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे पाकपुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिलच्या सकाळी २६ पर्यटकांचा बळी घेतला होता.त्यानंतर १५ दिवसांनी भारताने बदला घेतला.या हल्ल्यात मसुद अझहरच्या प्रमुख तळांना लक्ष्य करण्यात आले.यात बहावलपुर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालयवर झालेल्या हल्ल्यात मौलाना मुसद अझहर याच्या कुटुंबातील अनेक सदस्य ठार झाले आहे.
मसूद अझहर म्हणाला, ‘माझी माणसे मला सोडवतीलच…
पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये मसूद अझहरचा जन्म १० जुलै १९६८ रोजी अल्लाहबक्ष साबीरच्या कुटुंबात झाला होता. अझहरचे वडील साबीर बहावलपूरमधील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते.राहणारा मसुद अझहर एक सरकारी शिक्षकाचा मुलगा, ज्याने कराची येथील मदरसा येथून शिक्षण घेतले आहे. ९० च्या दशकात त्याने हरकत-उल-मुजाहिदीन संघटनेचा रस्ता पकडला तो दहशतवादी झाला. त्यानंतर त्याने जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेची स्थापना केली. १९९४ मध्ये श्रीनगर येथे मसुद अझहर याला अटक झाली.त्यानंतर तो तुरुंगात होता. तेव्हा त्याने मला जास्त काळ तुरुंगात रहावे लागणार नाही माझी माणसे येऊन मला सोडवणारच अशी धमकी दिली होती. त्यानंतर १९९९ च्या इंडियन एअरलाईन्स फ्लाईट IC-814 च्या हायजॅक प्रकरणात मौलाना मसुद अझहर याच्या सह तीन अतिरेक्यांना भारताला प्रवाशांच्या जीवरक्षणाच्या बदल्यात सोडावे लागले होते. त्याची फार मोठी किंमत नंतर भारताला भोगावी लागली…




कोणत्या हल्ल्याला जबाबदार ?
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या अतिरेकी संघटनांच्या प्रमुख तळांना लक्ष्य करण्यात आले.ज्यात बहावलपुर स्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेचे मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात मसुद अझहरचा कुटुंबातील अनेक सदस्य ठार झाले आहेत.
१९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या फ्लाईट IC-८१४ च्या हायजॅक केल्यानंतर प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मसुद अझहर याच्यासह तीन दहशतवाद्याची सुटका केली. मौलाना मसुद अझहर तुरुंगातून सुटल्यानंतर लगेच २००० मध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेची स्थापना केली.या अतिरेकी गटाने साल २००१ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभा आणि संसदेवर आत्मघाती हल्ला केला, साल २००६ मध्ये श्रीनगरवरील अतिरेकी हल्ला, साल २०१६ चा पठाणकोठ एअरबेसवरील हल्ला,नगरोटा आणि उरी येथील सैन्य तळांवरील हल्ला आणि साल २०१९ मध्ये पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील आत्मघाती हल्ल्याचा समावेश होता. पुलवामामधील हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते.त्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झाला…
जागतिक दहशतवादी घोषीत
भारताला मसुद अझहरला विमान प्रवासी वाचविण्यासाठी सोडावे लागले पण त्याने त्यानंतर हल्ल्याची मालिकाच सुरु केली ..पुलवामानंतर भारताने बालाकोट येथील जैशच्या अतिरेकी प्रशिक्षणतळांवर एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर मे २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मसुद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले.आयएसआयने जैशचा वापर भारतावरील हल्ल्यांसाठी केला होता याची कबुली खुद्द पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी केला होता.
प्रशिक्षण तळांवरच स्ट्राईक
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारताने बहावलपुर स्थित जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालयवर देखील मिसाईल डागल्या आहेत. एअर स्ट्राईकमध्ये मसुद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य आणि अन्य ४ जवळचे साथीदार ठार झाला आहे. भारताने केवळ पहलगामचाच बदला घेतला असे नव्हे तर गेल्या सर्वच हल्ल्यांचा हिशेब चुकता केला आहे. जगभराने भारताच्या या अतिरेकी तळांवरील कारवाईचे समर्थन केले आहे.