हत्यार नसलेलं ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचं खतरनाक षडयंत्र; भारताने वेळीच उचललं मोठं पाऊल अन्…
पाकिस्ताननं गुरुवारी भारतावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांनी शस्त्र नसलेले काही ड्रोन देखील पाठवले होते, या संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आज पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्री आठ वाजता भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने भारतातील सैन्य तळांना लक्ष्य करण्यासाठी काही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानने तुर्कीच्या ड्रोनचा वापर केल्याचं समोर आलं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
आठ मे रोजी भारताच्या सीमेलगतच्या शहरांवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, या हल्ल्यासाठी पाकिस्तानने तुर्कीच्या ड्रोनची मदत घेतली आहे, हल्ल्यादरम्यान पाकिस्तानचे जे ड्रोन भारतानं पाडले, त्या ड्रोनची प्राथमिक फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे, त्यातून हे तुर्कीचे ड्रोन असल्याचं समोर आलं आहे, या ड्रोनचा उपयोग हा एखाद्या गोष्टीची टेहळणी करण्यासाठी तसेच जवळून अचूक हल्ला करण्यासाठी करण्यात येतो, अशी माहिती देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, 8 आणि 9 मे दरम्यान पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवरून अनेकदा भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन केलं, भारतीय सैन्य तळांना लक्ष्य बनवण्याचा त्यांचा उद्देश होता. पाकिस्तानकडून एलओसीवर देखील गोळीबार सुरूच आहे. आतापर्यंत भारताच्या 36 ठिकाणांवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र हा हल्ला भारतानं परतून लावला आहे. पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न होत आहे.
पाकिस्तानने शस्त्र नसलेले ड्रोन देखील पाठवले होते, या मागे त्यांचा उद्देश असा होता की, भारतीय सैन्य तळांची टेहळणी करणे, सोबतच इतर काही गुप्त माहिती मिळवण्याच्या उद्देशानं देखील त्यांनी हा ड्रोन हल्ला केला होता असं व्योमिका सिंह यांनी म्हटलं आहे. या ड्रोन हल्ल्याच्या मागे दहशत पसरवण्याचं पाकिस्तानचं कट कारस्थान उघड झालं असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून, पाकिस्तानने गुरुवारी भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतानं देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताकडून देखील हल्ला करण्यात आला.