अखेर प्रतिक्षा संपली… शेतकऱ्यांच्या खात्यात आले झटपट 2 हजार रुपये, केंद्राच्या त्या योजनेचा मोठा लाभ
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये रिमोटचे बटन दाबताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात.

PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता जाहीर केला आहे. या हप्त्याच्या माध्यमातून देशभरातील 9.32 कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एकूण 18,640 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची शेतकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर हा हप्ता जाहीर झाल्यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत देते.
काही खात्यांमध्ये उशिरा येऊ शकते रक्कम
अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र एकाच वेळी 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे शक्य नसल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे जर अजूनही पैसे जमा झाले नसतील तर थोडी प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यातून या योजनेचा 22 वा हप्ता जाहीर केला. यापूर्वी 19 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी तामिळनाडूमधून या योजनेचा 21 वा हप्ता जाहीर केला होता.
पैसे जमा झाले की नाही कसे तपासावे?
शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे दोन प्रकारे तपासू शकतात. बँक खात्याचा बॅलन्स तपासून किंवा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन.
यासाठी शेतकऱ्यांनी PM Kisan Official Portal या अधिकृत संकेतस्थळावर जावे. त्यानंतर Know Your Status या पर्यायावर क्लिक करून आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा भरावा. त्यानंतर स्क्रीनवर आपल्या खात्याची माहिती दिसेल. यात आतापर्यंत मिळालेल्या हप्त्यांची माहिती तसेच 22 व्या हप्त्याची नोंद देखील पाहता येईल.
