PM Narendra Modi: LPG संकट गडद, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थेट निर्देश, अफवा पसरवल्यास…
PM Narendra Modi: देशात LPG सिलेंडरचे संकट अजूनच गडद झाले आहे. व्यावसायिक वापराचे सिलेंडर पुरवठा बंद झाला आहे. तर घरगुती वापराच्या सिलेंडरचा तुटवड्याने ग्राहकांच्या लांबच लांब रांगा एजन्सीबाहेर लागल्या आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट निर्देश दिले आहेत.

LPG Shortage : इराणच्या युद्धाने भारतात LPG गॅसचा तुटवडा झाला आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईने सर्वसामान्यांना रांगेत उभं केलं आहे. काम सोडून सिलेंडरसाठी लोक लांबच लांब रांगेत उभे ठाकले आहेत. उन्हातान्हात तहान भूक विसरून नागरीक एका सिलेंडरसाठी ताटकळलेले चित्र देशभरात दिसून आले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ही परिस्थिती अधिक भयावह करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. अशा लोकांवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. तर संभाव्य संकटासाठी भारताने संपूर्ण तयारी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळाशी इराण संकटासह देशातील परिस्थितीवर चर्चा केली. त्यांनी यापरिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. काही लोक या परिस्थितीचा गैर फायदा घेत भीती निर्माण करत असल्याचे मोदी म्हणाले. अशा लोकांवर करडी नजर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी मंत्र्यांनी समाज माध्यमांवर सक्रिय राहावे आणि विरोधकांना थेट उत्तर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतर देशांपेक्षा भारताची तयारी उत्तम
मंत्र्यांनी अशा कोणत्याही दुष्प्रचाराला उत्तर देण्यासाठी तयार राहावे. त्यांनी आत्मविश्वास बाळगावा. सध्याची परिस्थिती देशालाच नाही तर जगाला प्रभावित करत आहे. भारताची या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. आपले शेजारील देश आणि इतर देशांपेक्षा भारताची तयारी चांगली आहे. या संकटावर लवकरच आपण मात करू असा विश्वास त्यांनी दिला.
यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काल बुधवारी तामिळनाडूमध्ये एका सभेला संबोधित केले. या परिस्थितीने घाबरून जाऊ नका. आमचे सरकार लोकहित जपेल असे आश्वासन त्यांनी दिले. तामिळनाडूमद्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी एलपीजी संकटाचा लवकरच निपटारा करण्यात येईल आणि सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. “मी लोकांना आवाहन करतो की, त्यांनी योग्य आणि पडताळा करूनच माहिती द्यावी”,असे मोदी म्हणाले.
होर्मूजमधून आनंदवार्ता
इराणच्या होमूर्ज समुद्रधुनीतून (Strait of Hormuz) भारतासाठी आनंदवार्ता आली आहे. इराणने या भागातून जहाजांच्या दळणवळणास प्रतिबंध घातला आहे. पण परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली आणि पेच सुटला. त्यामुळे भारताचे दोन टँकर, पुष्पक आणि परिमल हे सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत.
