ऑपरेशन सिंदूरबद्दल मोदींची ‘मन की बात’; गडचिरोलीतल्या गावाचीही सांगितली खास गोष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. 'मन की बात' या कार्यक्रमाचा हा 122 वा भाग होता. यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ऑपरेशन सिंदूर हे दृढनिश्चय आणि धैर्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

“आज संपूर्ण देश दहशतावादाविरुद्ध एकवटलं आहे. प्रत्येकाच्या मनात दहशतावादाविरोधात संताप आहे. आपल्याला हा दहशतवाद संपवायचा आहे, हा आज प्रत्येक भारतीयाचा संकल्प आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपल्या सैन्याने दाखवलेल्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात म्हणाले. शनिवारी त्यांनी या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूर हे दोन मुद्दे अधोरेखित केले.
“काही दिवसांपूर्वी मी रायझिंग नॉर्थ ईस्ट समिटला गेलो होतो. तिथे मला अष्टलक्ष्मी महोत्सवाची माहिती मिळाली. सिक्कीमचे डॉ. चेवांग नोरबू भुटिया यांनी क्राफ्टेड फायबर्सला ब्रँड बनवलं. त्यांनी सिक्कीमच्या विणकाम परंपरेला एक नवी दिशा दिली. पेशाने पशुवैद्य असलेल्या भुटिया यांनी अनेक ग्रामीण महिलांना या कामाशी जोडलं. याअंतर्गत हस्तकलेच्या माध्यमातून शाल, स्टोल, हातमोजे आणि मोजे बनवले जातात”, असं ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “आपल्या सैन्याने दाखवलेल्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यांनी सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे ज्या अचूकतेने उद्ध्वस्त केले ते थक्क करणारं आहे. ऑपरेशन सिंदूरने जगभरातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नवा आत्मविश्वास आणि उत्साह दिला आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नव्हती, तर आपल्या दृढनिश्चयाचं, धैर्याचं आणि बदलत्या भारताचं चित्र आहे. या चित्राने संपूर्ण देशाला देशभक्तीच्या भावनांनी भरलंय आणि तो तिरंग्यातही रंगवला गेलाय. भारताने बनवलेल्या शस्त्रास्त्रांचं, उपकरणांचं आणि तंत्रज्ञानाचं बळ या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पहायला मिळालं. या विजयात आपल्या अभियंत्यांच्या, आपल्या तंत्रज्ञांच्या घामाचा सहभाग आहे.”
Maoist strongholds are now hubs of progress. #MannKiBaat pic.twitter.com/0e0KsFwCTs
— PMO India (@PMOIndia) May 25, 2025
‘मन की बात’मध्ये मोदींनी एका गावाचीही गोष्ट सांगितली. ते म्हणाले, “बसने प्रवास करणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. पण मी तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगू इच्छितो जिथे पहिल्यांदाच बस आली. तिथले लोक वर्षानुवर्षे या दिवसाची प्रतीक्षा करत होते. जेव्हा बस पहिल्यांदाच या गावात पोहोचली, तेव्हा तिथल्या लोकांनी ढोल वाजवून त्याचं स्वागत केलं. हे गाव महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आहे. काटेझारी असं या गावाचं नाव आहे. हे गाव माओवाद्यांच्या हिंसाचाराने प्रभावित होतं. इथं पहिली बस धावल्याने संपूर्ण परिसरात बदल जाणवत आहे. इथली परिस्थिती झपाट्याने सर्वसामान्य होत आहे.” यावेळी त्यांनी दंतेवाडा जिल्ह्याच्या दहावी आणि बारावीच्या उत्कृष्ट निकालाबद्दल आनंदही व्यक्त केला.
Lion numbers soar in Gir! #MannKiBaat pic.twitter.com/ANUKiCvH9Q
— PMO India (@PMOIndia) May 25, 2025
‘मन की बात’मध्ये त्यांनी गुजरातच्या गीरमध्ये वाढलेल्या सिंहांच्या संख्येचाही उल्लेख केला. “गेल्या पाच वर्षांत गुजरातमधील गीरमध्ये सिंहांची संख्या 674 वरून 891 पर्यंत वाढली आहे. गुजरात हे पहिलं राज्य बनलंय जिथे महिला या वन अधिकारी पदावर मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. यात सर्वांच्या मेहनतीचा वाटा आहे. वन्यजीव संरक्षणासाठी आपण नेहमीच सतर्क राहिलं पाहिजे.”
