नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार, ऑपरेशन सिंदूरनंतर काय बोलणार याकडे लक्ष
India Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती केल्याच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे. असे असतानाच आता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर मोठी माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर नेमकं काय सांगणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाल आज रात्री 8 वाजता संबोधित करणार आहेत. सध्याच्या युद्धजन्य काळात सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. असे असतानाच आता मोदी आज देशाशी बातचित करणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
मोदींचे बैठकांचे सत्र
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मोदी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर मोदींनी देशात येऊन अनेक बैठका घेतल्या होत्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री, संरक्षणंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सेनादलाचे प्रमुख यांच्यासोबत मोदी यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकांत राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, भारताचे पाकिस्तानविरोधातील धोरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच या बैठकांनंतरच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले. या सर्व घडामोडींनंतर आता मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरविषयी लष्कराकडून सविस्तर माहिती
तत्पूर्वी मोदी यांच्या संबोधनाआधी गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कराने पत्रकार परिषदा घेऊन ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली आहे. याजदेखील भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी एकत्र येत ऑपरेशन सिंदूर कसे राबवले. पाकिस्तानचे हल्ले परतवून लावण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा उभी करण्यात आली होती, याची सविस्तर माहिती देण्यात आली. आज दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे. ही चर्चा होत असतानाच आता मोदी देशाला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोदी यांच्या संबोधनात नेमकं काय असणार आहे? ते देशाला नेमकं काय सांगणार आहेत? याची उस्तुकता सर्वांनाच लागली आहे.
