पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सानिया मिर्झा स्पष्टच म्हणाली..
'ऑपरेशन सिंदूर'नंतर टेनिसपटू सानिया मिर्झाची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे. यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारताने पाकिस्ताना आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. या ऑपरेशन सिंदूरवर जागतिक स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच टेनिस स्टार सानिया मिर्झाचीही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सानिया मिर्झा ही पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पूर्व पत्नी असल्याने तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. तिने सोशल मीडियावर भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या पत्रकार परिषदेतील एक फोटो शेअर केला आहे.
मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत झालेल्या कारवाईनंतर बुधवारी सकाळी 10.30 वाजता भारताच्या परराष्ट्र सचिवांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंहसुद्धा उपस्थित होत्या. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैन्यदल आणि वायुसेनेचं संयुक्त अभियान होतं. सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी ऑपरेशनबद्दलची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्याचा फोटो शेअर करत सानियाने लिहिलं, ‘या अत्यंत पॉवरफुल फोटोमध्ये परफेक्ट संदेश देण्यात आला आहे की एक देश म्हणून आपण काय आहोत.’ सानियाची ही पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली आणि नेटकऱ्यांनी तिचंही कौतुक केलं.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांनी आपले प्राण गमावले होते. या हल्ल्यानंतर दहशवादाविरोधात मोठी कारवाई व्हावी अशी मागणी संपूर्ण भारतातून केली जात होती. या हल्ल्याच्या 14 दिवसांनंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केलं.
दरम्यान ऑपरेशन सिंदूरमुळे गोंधळून गेलेल्या पाकिस्तानने बुधवारी आणि गुरुवारी रात्री जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील सीमेलगतच्या भागांमध्ये हल्ले केले. मात्र भारताच्या मजबूत हवाई यंत्रणांनी हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले. उलट प्रत्युत्तरात भारताने केलेल्या कारवाईत लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उद्ध्वस्त झाल्याचं समजंतय.
पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेले हल्ले हे पहलगाममधील हल्ल्याचं प्रत्युत्तर होतं. त्यामुळे आता पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिला.