जिथे हिंदूंची संख्या जास्त तिथे मुस्लिमांना धोका नाही, ओवैसींना जी किशन रेड्डी यांचे प्रत्युत्तर
TV9 Satta Sammelan: ओवैसी यांनी भारतात ईद साजरी करण्याचीही मोकळीक नाही असे म्हटले होते. यावर बोलताना मंत्री जी किशन रेड्डी यांनी जिथे हिंदूंची संख्या जास्त तिथे मुस्लिमांना धोका नाही असं विधान केले आहे.

टीव्ही9 नेटवर्कच्या सत्ता संमेलनात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिल्लीतील उत्तम नगर येथील घटनेवर असदुद्दीन ओवैसी यांच्यावर प्रत्युत्तर दिले. याच कार्यक्रमात ओवैसी यांनी भारतात ईद साजरी करण्याचीही मोकळीक नाही असे म्हटले. यावर रेड्डी यांना ओवैसी यांच्या विधानावरतुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना जी किशन रेड्डी यांनी, ‘हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे काहीही नाही. हा पाकिस्तान आहे का? असं विधान केले. मंत्री जी किशन रेड्डी यांनी काय म्हटले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुस्लिमांना धोका नाही – जी किशन रेड्डी
असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानावरील प्रश्नावर बोलताना मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, ‘हा पाकिस्तान नाही, येथे खूप स्वातंत्र्य आहे. प्रत्येक गोष्टीची मोकळीक आहे. इथे जितके स्वातंत्र्य आहे, तितके जगातील कुठल्याही देशात नाही. रेड्डी पुढे म्हणाले की, जोपर्यंत भारतात लोकशाही आणि सनातन परंपरा टिकून आहे, तोपर्यंत सर्व धर्मांचे लोक आपले जीवन मोकळेपणाने जगू शकतात. कोणतीही अडचण नाही. हिंदू अल्पसंख्यांक झाले तर समस्या निर्माण होईल, पण हिंदू बहुसंख्यांक असतील तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही.’
स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये – रेड्डी
ओवैसी यांनी असा आरोप केला की, गंगेत नाल्याचे पाणी मिसळले जातात ते सहन केले जाते, पण हाडे टाकण्याच्या नावाखाली मुस्लीम समाजाला लक्ष्य केले जाते. यावर रेड्डी म्हणाले की, ‘हे पूर्णपणे चुकीचे आहे. देशात खूप स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये. जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावू नयेत. नैसर्गिक कारणांमुळे काही झाले तर वेगळी बाब आहे, पण मुद्दाम तसे करू नये.’
जी किशन रेड्डी यांची राहुल गांधींवरही टीका
जी किशन रेड्डी यांना विचारण्यात आले की, यावेळी संसदेत राहुल गांधी खूप चर्चेत होते. ते म्हणतात की मी देशविरोधी नाही, मी फक्त सरकारला प्रश्न विचारतो. यावर बोलताना रेड्डी म्हणाले की, ‘जेव्हा पाकिस्तानवर कारवाई झाली तेव्हा त्यांनी पाकिस्तानविरोधात काहीही बोलले नाही. त्यांना फक्त सैन्याविरुद्ध बोलायचे आहे. सरकारच्या एकाही योजनेचे त्यांनी समर्थन केले नाही. त्यांनी कोरोना लसीचा विरोध केला, जीएसटीचा विरोध केला. अमेरिका देखील भारताकडून लस घेत होती, पण राहुल गांधी यांनी त्यालाही विरोध केला. आर्टिकल 370 हटवले तेव्हाही त्यांनी विरोध केला.’
