TV9 Satta Sammelan : जे लोक द्वेष पसरवतात, त्यांनाच बंधुभावाचा पुळका, रामदेव बाबांनी कुणावर साधला निशाणा?
टीवी9 सत्ता संमेलनामध्ये बाबा रामदेव यांनी धार्मिक विभागणी नाकारली. गरब्यात मुस्लिमांचा प्रवेश व खुल्या जागेतील नमाजाबद्दल भाष्य केले. एवढंट नव्हे तर ते यूजीसीच्या नियमांवरही बोलले. समाजात बंधुभाव आणि व्यक्तिगत आदरावर त्यांनी भर दिला.

TV9 Satta Sammelan 2026 : TV9 भारतवर्षच्या सत्ता संमेलनात बाबा रामदेव सहभागी झाले होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी स्पष्ट उत्तर दिली. गरब्यात मुसलामानांच्या एंट्रीवर बॅन का असतो आणि त्यांना खुल्या जागेत नमाज पठण करण्यास मनाई का असते ? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला असता, अशी वक्तव्यं, अशी चर्चा फूट पाडणारी असल्याचं ते म्हणाले. मक्का-मदिनामध्ये गैर-मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी का आहे, याचं उत्तर काय देता येईल? असं ते म्हणाले.
आपल्याला मक्का-मदीना येथे जाऊन काय करायचं आहे ? “तेरे पूजन को भगवान बना मन मंदिर आलीशान” (प्रभू, माझे मन तुझ्या उपासनेसाठी एक भव्य मंदिर बनलं आहे). आपल्या आत, मनात देव आहे. आपल्याला मक्का-मदीना, किंवा व्हॅटिकन सिटीत जाण्याची गरज नाही. ही अविचारी उदारता देखील खूप धोकादायक आहे. मशिदीत ‘ॐ नमः शिवाय’, गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप कोणी ऐकला आहे का? तुम्ही सर्वांनी मंदिरात नमाज अदा करावी का? त्यांना त्यांच्या मेळाव्यांचा आनंद घेऊ द्या. प्रत्येकजण आपापल्या कुटुंबात आनंदी असतो. कुणीही दुसऱ्याच्या घरात शिरणं योग्य नाही. तुमच्या मशिदी आणि मंदिरे थाटामाटात सजवा, पण सार्वजनिक ठिकाणी द्वेष पसरवू नका, असं ते म्हणाले.
जे लोकं द्वेष, घृणा पसरवतात ते आपापसांत बंधूभावाचे नारे देतात आणि दुसऱ्यांना बिचारं समजतात. हीच गडबड आहे. जे लोक जाणूनबुजून द्वेष पसरवतात, ते आपले ध्येय साध्य करण्यासाठी हिंसाचाराला चिथावणी देतात आणि मग औदार्याबद्दल बोलतात, असं म्हणत त्यांनी दुटप्पीपणावर निशाणा साधला.
UGC च्या मुद्यावर काय म्हणाले बाबा रामदेव ?
दरम्यान, UGCच्या नियमांसंदर्भात सुरू असलेल्या वादाकडे तुम्ही कसे पाहता, असं विचारले असता त्यांनी त्यावरही स्पष्ट उत्तर दिलं. “जो कोणी UGCच्या बाजूने किंवा विरोधात बोलेल, त्याच्यावर टीका होईल. मला त्याची चिंता नाही. जात, वर्ग किंवा समुदायाच्या नावावर कोणतेही कायदे बनवले जाऊ नयेत. कोणीही कोणाचा छळ करू नये. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे.” असं त्यांनी सांगितलं.
ब्राह्मणांबद्दल बाबा रामदेव म्हणाले..
या संमेलनादरम्यान बाबा रामदेव यांनी ब्राह्मणांवरून होणाऱ्या अनेक वादांवर भाष्य केलं. ” ब्राह्मण ही काही एक जात नाही; जे तल्लख बुद्धीचे असतात त्यांना ब्राह्मण म्हटले जाते. त्यांनी प्रचंड योगदान दिलं आहे. प्रत्येक जाती-वर्गातील लोकांची कामे वेगवेगळी असतात. मी मनाने ब्राह्मण, शक्तीने क्षत्रिय आणि सर्वांची सेवा करत असल्यामुळे महादलित आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. कोणीही डोक्याने विद्वान म्हणून जन्माला येत नाही; प्रत्येकजण आईच्या गर्भातून जन्माला येतो. तार्किकदृष्ट्या विचार केल्यास, यात कोणताही फरक नसावा.” असं बाबा रामदेव यांनी नमूद केलं.
