तरुणाईच्या लाटेवर स्वार, CJP राजकारणात उडी घेणार? सत्ताधाऱ्यांना फाईट देणार? उत्तर काय?
CJP in Indian Politics: सध्या CJP हा तरुणाईचा मंत्र झाला आहे. देशभरातील जेन झी आणि अल्फा या पिढींच्या तोंडी केवळ कॉक्रोच जनता पार्टी हेच नाव आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांना नडणार पक्ष समोर आल्याची भावनाही जनतेत आहे. CJP खरंच देशाच्या राजकारणात उतरणार? CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास म्हणाले काय?

CJP in Indian Politics: देशाचा CPU काय आहे , तर तरुणाई आणि त्यांच्या तोंडी सध्या CJP हा एकच मंत्र आहे. कॉक्रोच जनता पार्टीने देशात एक चमत्कार घडवल्याचे जनतेला वाटत आहे. गेल्या दोन सत्रात मोदी सरकारच्या कोणत्याच मंत्र्यांने राजीनामा दिला नव्हता. पण कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनासमोर मोदी सरकार झुकले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. जेन झी आणि अल्फा या पिढींच्या तोंडी CJP हाच नारा आहे. काल तरुणाईने अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडले. तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेला हा नवीन डिजिटल पक्ष देशाच्या राजकारणात उडी घेईल का? CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांचे काय आहे उत्तर?
CJP कडून मोठे संकेत
कॉक्रोच जनता पार्टीच्या एका नेत्याला याविषयी विचारले असता, त्याने मोठे संकेत दिले. CJP पूर्णवेळ राजकारणात उतरले का? असा सवाल त्याला करण्यात आला. तेव्हा, ” भारतात कोणत्याही गोष्टीला कधीही ‘नाही’ असे म्हणायचं नसते.” असे उत्तर या नेत्याने दिले. म्हणजे सीजेपीच्या नेत्याने सक्रिय राजकारणापासून फटकून वागणार नाही असे सांगितले आहे. अगोदर पक्षाला स्थानिक स्तरावर मजबूत करण्यात येणार आहे.
आशुतोष रांका म्हणाला काय?
“सध्या माझ्या डोक्यात घरी जाऊन झोपण्याची योजना आहे. कुटुंबाची भेट घ्यायची आहे. मी गेल्या कित्येक महिन्यापासून घरापासून दूर आहे. खरं सांगू? मला आता आरामाची फार गरज आहे. गेल्या दोन महिन्यात जे काही घडलं, त्यावर मी मंथन करणार आहे. हा आमच्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. सध्या आरामाची गरज आहे. त्यानंतर पुढे काय करायचंय ते आम्ही ठरवू.” असे उत्तर CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दिले.
‘नाही’ म्हणायचे नाही
तुम्ही राजकारणात सक्रीय होणार का? असा थेट सवाल त्यांना विचारण्यात आला तेव्हा, ” भारतात कोणत्याही गोष्टीला कधीही ‘नाही’ असे म्हणायचं नसते.” असे रांका यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे सौरव दास यांनी मात्र विरोधी सूर आळवला. राजकारणाची प्राप्ती हे या आंदोलनाचे, गटाचे उद्दिष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर आंदोलन आणि पक्ष घेऊन जाणे हेच सध्या आमच्यासमोरील उद्दिष्ट आहे. कारण देशात अगोदरच 750-800 राजकीय पक्ष आहेत. त्यातील एकही पक्ष तरुणांचा हुंकार ऐकू शकलेला नाही. त्यांना तरुणाईचा आवाज होता आलेले नाही. सध्या आम्ही स्थानिक पातळीवर अधिक मजबूत होण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे सत्तेत कोणताही पक्ष असो वा कोणताही नेता असो तो तरुणाईच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू शकणार नाही, असे आमचे सध्याचे उद्दिष्ट असल्याचे दास म्हणाले.
