AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Special: ना कुठल्या मोर्चाचं निमंत्रण, ना विधान परिषदेचं तिकीट, पंकजा मुंडे नावाचं राजकारणातलं ‘अंदमान’ !

ज्याला कुणाला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची असेल त्याला अंदमानला पाठवलं जायचं. हा इतिहास. चार भींतीच्या आत एखाद्याला डांबूनही शिक्षा दिली जाऊ शकते. ती इथं पुण्या, मुंबईतही दिली जाऊ शकली असती पण मग अंदमानलाच का पाठवलं जायचं? एवढ्या दूर देशी का? तर त्याचं कारण आहे एकटेपण

tv9 Special: ना कुठल्या मोर्चाचं निमंत्रण, ना विधान परिषदेचं तिकीट, पंकजा मुंडे नावाचं राजकारणातलं 'अंदमान' !
पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, भाजपImage Credit source: TV9
| Updated on: Aug 22, 2022 | 2:32 PM
Share

गेल्या काही दिवसात भाजपानं महाराष्ट्रात रान उठवलंय. औरंगबादमध्ये (Aurangabad) पाण्यासाठी भाजपानं जल आक्रोश मोर्चा काढला. त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी केलं. दोन केंद्रीय मंत्रीही जातीनं हजर होते. भागवत कराड (Bhagwat Karad) आणि रावसाहेब दानवे. दानवेंनी (Danve) तर फडणवीसांसाठी ‘बाऊन्सर्सचं’ काम केल्याचं अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. एवढच काय भाजपचे छोटे मोठे नेतेही होते. खानदेशातले गिरीश महाजनही मोर्चात घोषणा द्यायला होते. काही महिला तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम असावा, तशा थाटात हातात हंडे वगैरे घेऊन घोषणाबाजी करत होत्या. औरंगाबादकरांनी अलिकडच्या काळात एवढा मोठा मोर्चा पाहिला नाही. तोही पाण्यासाठी. ह्या सगळ्या गर्दीत फक्त एकच व्यक्ती नव्हती. त्या म्हणजे पंकजा मुंडे. औरंगबाद हे पंकजा मुंडेंचं खरं तर दुसरं घर. परळीनंतर त्या बीडमध्ये कमी पण औरंगाबादमध्ये जास्त असतात. तसं त्या स्वत:ही म्हणाल्या. पण मग असं असतानाही , त्यांच्या शहराचा, त्यांच्या जिव्हाळ्याचा, त्यांच्या मराठवाड्याचा एवढा मोठा मोर्चा असतानाही त्या का नव्हत्या?

राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंकजा मुंडे

दुसऱ्या दिवशी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटेंनी त्यांना गाठलं आणि त्याबद्दलच विचारलं. प्रश्न असा होता की, औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर तुम्ही येणं अपेक्षीत होतं. तर त्या म्हणाल्या, मी औरंगाबादच्याच नाही तर कोणत्याही पाणी प्रश्नावर काम केलेलं आहे. जलयुक्त शिवार हा कॉन्सेप्टच माझा पाणी प्रश्नावर काम करण्याचा होता. राजकारणापलिकडं जाऊन काम करण्याचा माझा स्वभाव. त्यामुळे सामन्य माणसासाठी योजना राबवण्यासाठी मी नेहमीच काम केलेलं आहे. त्यामुळे मी मोर्चात नसले म्हणजे त्या प्रश्नासाठी मी जागरुक नव्हते असं म्हणणं चुकीचं आहे. त्या प्रश्नाविषयी माझी संवेदना आहेच आहे. आता असे अनेक मोर्चे निघतायत आता, कदाचित आता मी राष्ट्रीय लेव्हलवर काम करत असल्यामुळे इथल्या लोकल लोकांनी मिळून मोर्चा केला असेल तर चांगली गोष्टय. दत्तानं पुढचा प्रश्न विचारला, तुमची उपेक्षा होतेय का? त्यावर त्या हसत म्हणाल्या, टीव्ही ९ आहे का? मी त्या मोर्चामध्ये अपेक्षीत असते तर नक्की आले असते. लोकल लीडर्सचा तो मोर्चा होता आणि त्यामुळे मी आले नाही.

मुंबईत तात्याराव लहानेंच्या रुग्णालय कार्यक्रमात पंकजा मुंडे

पंकजा मुंडे दीड मिनिट बोलल्या. पण ह्या दीड मिनिटात त्यांची सध्याची काय अवस्था आहे हे समजण्यास पुरेसे आहेत. औरंगाबादचा एवढा मोठा मोर्चा झाला तर त्यात त्यांनी ना फडणवीसांचं नाव घेतलं ना, दानवे-कराडांचं, एवढच काय ज्या मोर्चाचं नेतृत्व भाजपच्या राज्यातल्या सर्वोच्च नेतृत्वानं केलं, ज्यात दोन केंद्रीय मंत्री होते, त्यांना त्या ‘लोकल लीडर्स’ म्हणाल्या. त्या असही म्हणाल्या की, मी अपेक्षीत असते तर आले असते. म्हणजे मोर्चाला बोलवलं जाईल याची त्यांना अपेक्षा होती जी पूर्ण झाली नाही. त्या असही म्हणाल्या की मी राष्ट्रीय लेव्हलवर काम करतेय त्यामुळे इथल्या लोकल लोकांनी मिळून मोर्चा केला असेल, बरोबर, पंकजा मुंडे राष्ट्रीय लेव्हलवर काम करतायत पण मग भागवत कराड, दानवे मोर्चात कसे? ते तर केंद्रीय मंत्री मग ते राष्ट्रीय लेव्हलवर काम करत नाहीयत का? औरंगाबादचा मोर्चा झाला नाही तोच मुंबईत भाजपनं ओबीसींचा मोर्चा काढला. ह्या मोर्चात चंद्रकांत पाटील होते, मुनगंटीवार होते, पडळकर वगैरे मंडळीही होती. पण भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून ज्या पंकजा मुंडेंकडे पहिल्यापासून पाहिलं जातं त्या मात्र कुठेही नव्हत्या. का? हा मोर्चाही लोकल लीडर्सचा होता? औरंगाबादमध्ये त्या म्हणाल्या की, मी राज्याचं एक शिष्टमंडळ घेऊन मध्यप्रदेशला जायला तयार आहे ओबीसींच्या भल्यासाठी, त्या जातीलही पण खुद्द त्यांच्याच पक्षाच्या ओबीसीच्या सर्वात मोठ्या मोर्चातही त्यांना ‘अपेक्षीलं’ गेलं नाही त्याचं काय? राष्ट्रीय लेव्हलवर  म्हणजे लोकल लेव्हलला कामच नाही असं आहे का? ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा पंकजांसाठी भाजपात नाही? याच ओबीसींच्या मोर्चात चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळेंना म्हणाले की, स्वयंपाक करा, घरी जा, मसनात जा. त्याच मोर्चात पंकजा मुंडे नव्हत्या हे विशेष.

जयपूरमध्ये पर्यटनाचा आनंद घेताना पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंचा सोशल मीडिया पाहिला तर त्या सध्या कुठल्या कामात व्यस्त आहेत ते स्पष्टपणे दिसतं. त्या कधी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसोबत पक्ष कार्यक्रमात दिसतात तर कधी जयपूरला वसुंधरा राजेंसोबत. मोदींच्या दौऱ्याचे, योजनांचे ट्विटही रिट्विट करतात. राष्ट्रीय पातळीवर काम म्हणजे दगदग तशी कमी असणार, तेव्हा त्या विरंगुळा म्हणून पर्यटनही करताना दिसतात. त्या राष्ट्रीय लेव्हलवरच राहणार असतील तर मग त्या विधानसभेऐवजी लोकसभाच लढणार का? त्या लोकसभा लढतील तर मग त्यांच्या भगिनी प्रितम विधानसभा लढतील? काही म्हणजे काही अंदाज सध्या तरी येत नाही. दिसतं फक्त एवढच की, पंकजा मुंडे राज्यातल्या भाजपच्या कुठल्याच पक्षीय कार्यक्रमात ‘अपेक्षीत’ नाहीत. का?

त्या पत्रकारांना भेटतात, बोलतात, पण त्यात कुठेही ठामपणा नसतो. जर तर जास्त असतात. फडणवीसांच्या अंगानं एखादा प्रश्न आला तर त्या देवेंद्रजींचे आभार एवढच त्रोटक बोलून संपवतात. ओबीसी आरक्षणासारख्या मुद्दावरही त्या कुठेही पक्षीय ठाम भूमिकेत दिसलेल्या नाहीत. पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस ओबीसी आरक्षण रद्द केलं, त्यानंतर भाजपची पत्रकार परिषद झाली तर त्यात पंकजांपेक्षा जास्त बावनकुळेच ठाम भूमिका मांडून गेले. पंकजा पहिल्यांदा बोलल्या पण त्या साईड रोलमध्येच जास्त वाटल्या. पंकजा निर्णय प्रक्रियेतच नसतात का?

ज्याला कुणाला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची असेल त्याला अंदमानला पाठवलं जायचं. हा इतिहास. चार भींतीच्या आत एखाद्याला डांबूनही शिक्षा दिली जाऊ शकते. ती इथं पुण्या, मुंबईतही दिली जाऊ शकली असती पण मग अंदमानलाच का पाठवलं जायचं? एवढ्या दूर देशी का? तर त्याचं कारण आहे एकटेपण. त्या कैद्याला एकटेपणाची शिक्षा देणं हेच अंदमान असायचं. यात बहुतांश ती नेते मंडळी होती ज्यांना लोकांच्या गर्दीची सवय होती. जय जयकार ऐकायचा असायचा. त्याची कानांना सवय झालेली असायची. अशाच नेत्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली जायची. कारण अंदमानला समुद्र होता, किनारा होता, लाटांचा आवाज होता, फक्त नसायचा तो लोकांचा आवाज. ते एकाकीपण त्याला भोगायला लागायचं. तीच त्याची खरी शिक्षा. सत्तेविरुद्ध बंड पुकारण्याची शिक्षा. पंकजा मुंडेही अशाच बंडाचं ‘अंदमान’ भोगतायत का?

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.