ममतांचा ‘जय मराठा’चा नारा, आज मुंबईत पवारांसोबत खलबतं, काँग्रेस चेकमेट?

| Updated on: Dec 01, 2021 | 9:30 AM

गेल्या आठवड्यात ममता दिल्लीत होत्या पण त्या एकाही काँग्रेस नेत्याला भेटल्या नाहीत. काँग्रेसनं बोलवलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवरही टीएमसीनं बहिष्कार टाकला. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जय मराठा, जय बांगलाचा नारा विरोधकांना कुठे घेऊन जाणार हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ममतांचा जय मराठाचा नारा, आज मुंबईत पवारांसोबत खलबतं, काँग्रेस चेकमेट?
ममता बॅनर्जी आज मुंबईत दुपारी शरद पवारांना भेटणार
Follow us on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee Mumbai tour) ह्या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यात आज दुपारी 3 वाजता त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांची भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी काल आधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं, नंतर शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे (Raut Aditya met Mamta) यांची भेट घेतली. मुंबईत पोहोचल्यानंतर ममतांनी जय मराठा, जय बांगलाचा नारा दिलाय. हा नारा राजकीय आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. ममता खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटू इच्छित होत्या पण सध्या मुख्यमंत्री हे बायोबबलमध्ये आहेत. त्यामुळे ममता-उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकणार नाही. पण गेल्या दोन वर्षात शरद पवारांनीच आघाडी सरकारचं सारथ्य केलं आहे. त्यामुळेच पवार-ममतांची आजची भेट देशाचं राजकारण बदलणार का ? विशेषत: 2024 मध्ये मोदींना बाजुला करण्यात यशस्वी होतील का अशी चर्चा केली जातेय.

पवारांशी जवळीक-काँग्रेसची अडचण

यूपीएच्या चेअरमनपदी सध्या काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आहेत. काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. राहुल गांधींनी ते पद सोडलंय आणि पुन्हा ते घेण्यासाठी तारीखवर तारीख दिली जातेय. त्यामुळे काँग्रेसची स्थिती विदारक आहे. याच पार्श्वभूमीवर यूपीएचा चेहरा होण्यासाठी काही नेते प्रयत्नशील आहेत. विशेषत: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या नावाची त्यासाठी वेळोवेळी चर्चा केली जातेय. हे दोनच नेते असे आहेत, ज्यांनी गेल्या काही काळात मोदी-शहांचा रथ राजकीय डावपेचांनी रोखलाय आणि आपआपल्या राज्यातली सत्ता हस्तगत केलीय. ममतांनी बंगाल जिंकलाय तर शिवसेनेला सोबत घेत, मुख्यमंत्रीपद देत पवारांनी महाराष्ट्र स्वत:कडे घेतलाय. दोन्ही नेत्यांच्या समोर एकच आव्हान आहे. आधी त्यांना काँग्रेसला सोबत घ्यावं लागेल आणि नंतर भाजपाविरोधात लढावं लागेल. यात त्यांना उद्धव ठाकरेंची साथ लागणारच आहे. कारण शिवसेनेचं लोकसभेतलं संख्याबळ विसरता येत नाही. ह्या सगळ्यांचा आजच्या पवारांसोबतच्या बैठकीत चर्चा केली जाईल अशी शक्यता वर्तवली जातेय.

काँग्रेसची अडचण?

काँग्रेसची मोठी अडचण आहे. त्यांना एकाच वेळेस भाजपच्याविरोधातही लढायचं आहे आणि दुसऱ्या बाजुला ममता-शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांची वाढती शक्तीही रोखायची आहे. खुद्द राहुल गांधींना 2024 च्या निवडणुकीसाठी चेहरा म्हणून पुढं करायचं आहे. पण त्यावर पवार-ममतांसारख्या नेत्यांची फारशी उत्सुकता-सहमती दिसत नाही. त्याला कारण राहुल गांधींच्या नेतृत्वाचा आतापर्यंतचा इतिहास. त्यातही काँग्रेसची नेतृत्वाची संभ्रम अवस्थेला शेवटच दिसत नाहीय. त्यामुळेच मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेस नेतृत्व किती सक्षम आहे यावर खुद्द काँग्रेस नेत्यांनीच वेळोवेळी साशंकता व्यक्त केलीय. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावतही याची चर्चा सुरुच आहे. गेल्या आठवड्यात ममता दिल्लीत होत्या पण त्या एकाही काँग्रेस नेत्याला भेटल्या नाहीत. काँग्रेसनं बोलवलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवरही टीएमसीनं बहिष्कार टाकला. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जय मराठा, जय बांगलाचा नारा विरोधकांना कुठे घेऊन जाणार हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा:

Hair Care : कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!

हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार, पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु

दिलासा नाहीच! गॅस सिलिंडर पुन्हा महागले; आता मोजावी लागणार इतकी किंमत