ED : संजय राऊतांनतर आता वर्षा राऊत यांचा जबाब, नेमके प्रकरण काय?
ईडीच्या अधिकाऱ्यांनी वर्षा राऊत यांचा जबाब तर नोंदवलाच पण काही कागदपत्रांची पाहणीही केली आहे.
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ जमिन घोटाळाप्रकरणी (land scam) खा. संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी होती. पण त्यांना दिलासा तर मिळालाच नाही पण राऊत कुटुंबियांच्या अडचणीत मात्र, वाढ झाली आहे. वर्षा राऊत (Varsha Raut) यांचा जबाब आता ईडीने नोंदवला आहे. यामध्ये अलिबाग येथील जमिन व्यवहाराची माहिती नसल्याचे वर्षा राऊत यांनी सांगितले आहे. दीड महिन्यापूर्वी याच जमिनी घोटाळा प्रकरणी राऊतांची चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतले होते. आता त्यांच्या कुटुंबियांचा देखील जबाब नोंदवला गेल्याने पाय आणखी खोलात का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
वर्षा राऊत ह्या संजय राऊतांच्या पत्नी आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची यापूर्वी देखील चौकशी झाली होती. आता संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात असून त्यांच्या चौकशीनंतर पुन्हा वर्षा राऊतांचा जबाब नोंदवला गेल्याने ईडीच्या हातामध्ये काय लागले अशी शंका वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे जबाब नोंदणीच्या काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जमिन खरेदीसाठी स्वप्ना पाटकरांचा प्रस्ताव होता हे राऊतांनी मान्य केला होता. तर राऊत वापरत असलेल्या गाड्यांची नोंदणी ही अनोळखी व्यक्तीच्या नावे असल्याचेही समोर आले आहे.
अलिबाग जमिन व्यवहाराबद्दल आपल्याला माहिती नाही, पण स्वप्ना पाटकरांचा प्रस्ताव संजय राऊत यांनी मान्य केला होता. त्यामुळे या व्यवहराबाबत संजय राऊत किंवा स्वप्ना पाटकरच अधिकची माहिती देऊ शकतील असेही वर्षा राऊतांनी जबाबमध्ये सांगितले आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी वर्षा राऊत यांचा जबाब तर नोंदवलाच पण काही कागदपत्रांची पाहणीही केली आहे. ज्यामध्ये कॅश, व्हीआर, एसपी अशा उल्लेख करण्यात आला आहे. पण हे नेमके काय आहे, याबाबत खुलासा झालेला नाही.
संजय राऊत यांनी जामीन मिळावा म्हणून कोर्टाकडे अर्जही केला होता. पण चौकशीच्या अनुषंगाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. शिवाय ईडीनेही त्यांच्या जामिनाला विरोधच दर्शवला होता.