शिंदे गटाला घरघर लागली, लवकरच काही लोक…ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; मोठी उलथापालथ होणार?
आमदार अब्दुल सत्तार यांनी निधीवाटपावरून आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्षणे आरोप केले आहेत. यावरच आता खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrakant Khaire : आमदार अब्दुल सत्तार यांनी निधीवाटपात माझ्या मतदारसंघाबाबत दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप संजय शिरसाट यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर संजय शिरसाट यांनीही कोणाला किती निधी देण्यात आला, याचे रेकॉर्ड जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु सत्तार यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केल्याने आता शिंदे यांच्या पक्षात नेत्या-नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचा दावा केला जात आहे. विधानपरिषदेचे आमदार अंबदास दानवे यांनी शिंदे यांचा पक्ष नसून ती तर एक गँग आहे. त्यांच्यात गँगवॉर चालत राहते, असे म्हणत शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. याच सत्तार यांच्या कथित नाराजीवर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार तथा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदे गटातील काही नेते भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावा केला आहे.
लोक म्हणतात की आता जुनीच शिवसेना बरी
चंद्रकांत खैरे हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी बोलताना शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता घरघर सुरू झाली आहे. काही लोक आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. काही लोक शांत आहेत. काही लोक म्हणतात जुनी शिवसेना बरी आहे, असा दावा खैरे यांनी केला. तसेच शिंदे गटातील नेत्यांमध्येच बेबनाव झाला तर आम्हाला बरं आहे. त्यांच्यात भांडणं झाली तर त्याचा फायदा उचला, असं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सांगावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदींचे महत्त्व आता कमी झाले
लोकसभेचे विरोधी पक्षानेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्षभरात सत्तेतून खाली येतील, असा दावा केला. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यावरच चंद्रकांत खैरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे महत्त्व आता कमी कमी होत आहे. लोकांचे प्रेम आता कमी होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत ना. त्यांनी ट्रम्प यांना आमचे नुकसान होऊ देऊ नका असे सांगायला हवे होते, अशी बोचरी प्रतिक्रिया दिली.
