जरांगे म्हणाले अजितदादांची मोठी चूक, आता भुजबळांकडून सणसणीत उत्तर, म्हणाले मराठा समाजाचे…
ष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आता त्याच खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आज सकाळी भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आता त्याच खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आज सकाळी भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. मात्र आता त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली आहे. असे असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. भुजबळ यांना मंत्रिपद देऊन उपमुख्यंत्री अजित पवार चूक करत आहेत, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या याच मताचा समाचार भुजबळ यांनी घेतलाय.
मनोज जरांगे यांनी चुका नव्हे तर खेळ केला
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना जरांगे यांच्या प्रतिक्रियेवर विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी जरांगे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. जरांगे यांच्यामुळे खुद्द मराठा समाजालाही त्रास झाला आहे. मनोज जरांगे यांनी चुका नव्हे तर खेळ केलेला आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे प्रचंड नुकसान केलेले आहे, अशी कठोर शब्दांत भुजबळ यांनी टीका केली. तसेच आम्ही मराठा समाजाला बंधू म्हणून मानतच आलेलो आहोत. सगळ्या ठिकाणींनी आमचा तसाच वावर आहे. पण जरांगे यांच्या कर्तृत्त्वामुळे मराठा समाजालाही त्रास झालाय, असा पलटावर भुजबळ यांनी केला.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
छगन भुजबळ यांनी शपथ घेतली काय किंवा नाही काय, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भुजबळ आधीही मंत्री होते. आताही ते मंत्री झाले आहेत. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. जातीयवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा? हे अजित पवार यांना का समजत नाही. अजित पवार प्रत्येक वेळी मोठी चूक करत आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपर्यंत त्यांना मंत्रिपद दिलं असेल. त्यांच्या आनंदावर भविष्यात शंभर टक्के विरजन पडेल, असं मला वाटतंय, असं मनोज जरांगे म्हणाले.
