त्यांना मी प्रसिद्धीच्या लायक…अबू आझमींच्या वारीवरील वक्तव्याचा फडणवीसांनी घेतला समाचार, म्हणाले…
अबू आझमी यांनी मुस्लिमांना नमाज पठण करण्यासाठी जागा दिला जात नाही, अशी खंत व्यक्त केली. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Devendra Fadnavis on Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. वारीमुळे रस्ता जाम होतो, पण मुस्लीम समाज तक्रार करत नाही. पण मुसलमानांनी नमाज पठण केलं तर तक्रार केली जाते, असं आबू आझमी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आझमी यांच्यावर सडकून टीका केलीय. मी त्यांना प्रसिद्धीच्या लायकीचं समजत नाही, असं टोला फडणवीस यांनी लगावलाय. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
मी त्यांना प्रसिद्धीच्या लायकी…
अबू आझमी यांनी केलेल्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं, असं पत्रकारांनी विचारलं. यावर बोलताना, मला वाटतं की अबु आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याची आवड आहे. वादग्रस्त विधानं केली की प्रसिद्धी जास्त मिळते, असं त्यांना वाटतं. त्यामुळंच मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळेच मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अबू आझमी नेमकं काय म्हणाले होते?
सोलापूरमध्ये बोलताना अबू आझमी यांनी वारी तसेच नमाज पठण यावर प्रतिक्रिया दिली. वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात. तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुसलमानांनी नमाज पठण केल्यावर तक्रार केली जाते, असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले.
मुसलमानांसाठी जमीन दिली जात नाही
आम्ही हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुसलमान बांधवांनी रस्त्यावर सण साजरे केले जातात त्याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळेस मशिदीमध्ये नमाज पडला जातो तेव्हा युपीचे मुख्यमंत्री म्हणतात, बाहेर जर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग परवाना रद्द केला जाईल. वारीमुळे रस्ता जाम होते आम्ही कधी त्याला मनाई केली नाही. जाणून-बुजून मुसलमानांसाठी जमीन दिली जात नाही, अशी खंतही आझमी यांनी व्यक्त केली.