Devendra Fadnavis : सत्तेत सहभागी होताना काहींना त्याग करावाच लागणार, कार्यकारिणी बैठकीत फडणवीसांनी इच्छुकांचे कान टोचले
मोठा पक्ष आहे. अनुभवी, चांगले नेते आहेत. असेही काही आमदार आहेत जे मंत्री झाले नाहीत पण त्यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. सगळ्यांचा विचार करावा लागेल पण विचार करायला तेवढ्या जागाच नाहीत, असं फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या स्थापनेला 20 दिवस लोटली. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचंही सांगितलं जातं. अशावेळी शिंदे गट आणि भाजपच्या (BJP) वाट्याला किती जागा मिळणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या (BJP Working Committee) बैठकीत इच्छुकांचे कान टोचलेत. आपल्या पक्षात या विस्तारात येऊ शकणारे पात्र असलेले नेते खूप आहेत. कारण मोठा पक्ष आहे. अनुभवी, चांगले नेते आहेत. असेही काही आमदार आहेत जे मंत्री झाले नाहीत पण त्यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. सगळ्यांचा विचार करावा लागेल पण विचार करायला तेवढ्या जागाच नाहीत, असं फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतो. जे पक्ष विचारासांठी चालले ते पक्ष चालले. ज्यावेळी विचार सोडून सत्तालोलुप झाले त्यावेळी ते पक्ष संपले. ज्यावेळी फक्त एकाधिकारशाही, घराणेशाही झाली त्यावेळी ते पक्ष संपले. आज भाजपसारखा पक्ष इतका मोठा होतो कारण भाजपमध्ये सामान्यातील सामान्य कार्यकर्ता प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो, देशाचा अध्यक्ष होऊ शकतो, देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. कारण आपण घराणेशाही मानणारा पक्ष नाही. एखाद्या नेत्याच्या मुलाने, मुलीने राजकारणात यावं याला पक्षाचा ना नाही. पण तो अधिकार कुणाचा नाही, पक्षावर अधिकार कुमाचा नाही. म्हणजे याच्यानंतर याला दिलंच पाहिजे असा अधिकार भाजपमध्ये नाही. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या मेहनतीनं पुढे यायचं आहे. असे अनेकजण आपल्या पक्षात पुढे येत आहेत.
कार्यकर्त्याला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागते
विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागते. अनेक लोक नंतर मला विचारतात त्याग आम्हीच करायचा का? पण कुणालातरी करावाच लागेल. त्यामुळे आपल्याकडील ही परंपरा आपल्याला कुठल्याही स्थितीत पुढे घेऊन जायची आहे. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करु इच्छितो की आपल्याला प्रामाणिक, स्वच्छ आणि लोकाभिमुख सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या जनतेच्या समस्या आहेत, आशा, आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही स्वच्छ मनाने करु, असंही फडणवीस यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितलं.
पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक उभे राहतील
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. आपल्या पक्षात या विस्तारात येऊ शकणारे पात्र असलेले नेते खूप आहेत. कारण मोठा पक्ष आहे. अनुभवी, चांगले नेते आहेत. असेही काही आमदार आहेत जे मंत्री झाले नाहीत पण त्यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. सगळ्यांचा विचार करावा लागेल पण विचार करायला तेवढ्या जागाच नाहीत. त्यामुळे तिथेही काही तडजोड आपल्याला करावी लागेल. पण मला निश्चितपणे विश्वास आहे की जो निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक उभे राहतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केलाय.