महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप

| Updated on: Dec 14, 2020 | 12:15 PM

धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं. 

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप
Follow us on

मुंबई: हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं.  त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आपलं आंदोलन करु दिलं. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. (Gopichand Padalkar’s agitation during the winter session)

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी जे आदिवासींना तेच धनगरांना दिलं होतं. धनगरांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही. यशवंत महामेश योजनाही राज्य सरकारनं रद्द केली. हे सरकार धनगर, भटक्या विमुक्त समाजाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोपही पडळकरांनी केला आहे.

धनगरांच्या अस्तित्वाशी खेळ- पडळकर

झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी धनगरी पेहराव परिधान करुन, ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा पेहराव आणि ढोल म्हणजे आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे. पण या अस्तिस्वाशी खेळ करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीका पडळकरांनी केलीय.

‘शेतकऱ्यांचे हाल, राष्ट्रवादीचे दलाल मालामाल’

राज्यातील शेतकऱ्यांच्या मुंड्या पिरगाळण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे हाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दलाल मालामाल अशी स्थिती राज्यात झाली आहे. त्यांच्या प्रत्येक सरदाराला कारखाना, सूत गिरणी, शिक्षण संस्था, दूध संघ आणि ज्याला काही देता आलं नाही त्याला मार्केट कमिटी, हे राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसचं धोरण असल्याचा हल्लाबोल यावेळी पडळकरांनी केलाय. मोदी सरकारचा प्रयत्न हा प्रश्न मुळापासून संपवण्याचा आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी प्रश्न तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यामुळे संघटना वाढायला हव्या आणि त्या संघटना यांच्या दावणीला बांधल्या गेल्या पाहिजेत, असा आरोपही पडळकरांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान

मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारं ठाकरे सरकार कंत्राटदारधार्जिणं; दरेकरांची घणाघाती टीका

Gopichand Padalkar’s agitation during the winter session