मुख्यमंत्र्यांकडून 24 तासात डॅमेज कंट्रोल, टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम, आव्हाड म्हणाले आनंद आहे!

| Updated on: Jun 23, 2021 | 4:45 PM

मुख्यमंत्र्यांनी मला आज सांगितलं, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या..१५ मिनिटात निर्णय झाला, बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे. विसंवाद असता तर २४ तासाच्या आत निर्णय झाला नसता.

मुख्यमंत्र्यांकडून 24 तासात डॅमेज कंट्रोल, टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम, आव्हाड म्हणाले आनंद आहे!
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
Follow us on

मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिलीय. 100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. (Tata Cancer Hospital to get flat in Bombay Dyeing, says Jitendra Awhad )

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर 24 तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असंही आव्हाड यांनी म्हटलंय. दरम्यान, कॅन्सर हॉस्पिटलला दिलेल्या सदनिकांना निर्णय स्थगित केल्यानंतर या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सत्तासंघर्ष सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. तसंच सर्वसामान्य नागरिकांकडूनही या स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आज डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. 16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. आपण आव्हाड यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यांच्याकडे तक्रारही केली होती. पण त्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. चौधरी यांच्या तक्रारीवर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली.

उदात्त भावनेनं निर्णय घेतला होता – आव्हाड

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याशी काल संपर्क साधला असता, आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून कुठलिही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. मात्र, याबाबत काही गैरसमज झाले असावेत. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. तसंच या निर्णयाला स्थगिती मिळाल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही, कॅन्सर हवेतून पसरत नाही; चौधरींच्या आरोपाला आव्हाडांचं प्रत्युत्तर

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

Tata Cancer Hospital to get flat in Bombay Dyeing, says Jitendra Awhad