Manoj Jarange Patil: मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील यांचा काळजाचा ठोका चुकवणारा निर्णय… पाणी, सलाईन आणि… चिंता वाढली
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मनोज जरांगे काहीही स्वीकारणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आंदोलनातील ही नवी भूमिका मराठा समाजात चिंतेचा विषय ठरली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मराठा आंदोलकांनी काल रात्रीपासूनच उपोषणस्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली असून, राज्यभरातील विविध भागांतून आंदोलक अंतरवली सराटीमध्ये पोहोचले आहेत. आता जरांगे पाटील यांनी रात्रीपासून पुन्हा उपचार घेणे बंद केले आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेक मराठा आंदोलकांची चिंता वाढली आहे.
काल रात्रीपासून पाणी आणि सलाईन बंद
काल रात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि सलाईनही बंद केली आहे. जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आता काहीही घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मागण्या पूर्ण झाल्यानंतरच उपचार घेणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी उपचार का सोडले?
उपचार बंद करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकारने ५८ लाख नोंदी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही ते काम सुरू झालेले नाही. हैदराबाद गॅझेटच्या वैधतेबाबतही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. गावांमध्ये दवंड्या पिटण्याचे सांगितले होते, पण तेही केले गेले नाही. हैदराबाद गॅझेटनुसार वैधता देण्याबाबतही स्पष्टता नाही.
२०१२ च्या जात पडताळणी कायद्यात मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासन शिष्टमंडळाने दिले होते. पण अजूनही शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलेले नाही. यामुळे हैदराबाद गॅझेटच्या वैधतेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे जरांगे यांनी उपचार पुन्हा बंद केले आहेत.
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मनोज जरांगे काहीही स्वीकारणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आंदोलनातील ही नवी भूमिका मराठा समाजात चर्चेचा विषय ठरली आहे. जरांगे यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाही ते मागण्यांच्या पूर्ततेशिवाय माघार घेण्यास तयार नाहीत. सरकारकडून आता ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे यांचे उपोषण आणि उपचार बंद करण्याचा निर्णय आंदोलनाला नवे वळण देणारा ठरला आहे.
