‘अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?’ आशिष शेलारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. त्यावर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजप असा ‘सामना’ रंगताना पाहायला मिळतोय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवल्यानंतर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला आहे. (BJP MLA Ashish Shelar criticizes Shiv Sena MP Sanjay Raut on Saamana editorial)
“त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलीसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका “सिंह” यांना “परमवीर” का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका “युवराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?” अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये फक्त राऊतांवरच नाही, तर युवासेनेचे प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही टीका केली आहे.
त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलीसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका “सिंह” यांना “परमवीर” का देताय?
खरी नौटंकी तर हीच आहे. एका “युवराजला” वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?
पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत? 2/2
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 5, 2020
“रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन “दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी…” असा इशाराही आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.
रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा!
अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन “दिशा सालीयन” बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी… 1/2
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 5, 2020
‘भाजपला सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मजा वाटते’
अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने केलेल्या या सर्व आरोपांवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. “चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील!!” असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे. आणीबाणीचा काळ ज्यांनी अनुभवला आहे त्यातले एक लालकृष्ण आडवाणी हयात आहेत व आणीबाणी काय होती हे सध्याच्या नवशिक्यांनी त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेत्यांवर शरसंधान साधण्यात आलं आहे.
‘अर्णव गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी’
इंदिरा काँग्रेसच्या आणीबाणीची शिवसेना समर्थक होती. आता शिवसेना काँग्रेसच्या आणीबाणीची समर्थक नाही, तर व्यवस्थापक झाली आहे, असा टोलाही आशिष शेलार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला होता. तसंच सोनियांची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या विषयावर आपल्या पक्षांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही शेलार यांनी दिलं आहे.
संंबंधित बातम्या:
अर्णव गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून, राज्य सरकारचा संबंध नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट
अर्णव गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, आशिष शेलारांचं आवाहन
पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप
BJP MLA Ashish Shelar criticizes Shiv Sena MP Sanjay Raut on Saamana editorial