भाजपला सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मजा वाटते, अर्णव प्रकरणावरुन शिवसेनेचं टीकास्त्र

भाजपने केलेल्या या सर्व आरोपांवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. (Shivsena Criticism on Arnab Goswami Arrest)

भाजपला सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मजा वाटते, अर्णव प्रकरणावरुन शिवसेनेचं टीकास्त्र
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 7:42 AM

मुंबई : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना काल (4 नोव्हेंबर) अटक करण्यात आली. यानंतर अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. पोलिसांचा दुरुपयोग करुन महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी लावल्याचा आरोपही यावेळी भाजपने केला. भाजपने केलेल्या या सर्व आरोपांवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. “चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील!!” असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे. (Shivsena Criticism on Arnab Goswami Arrest)

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं आहे?

सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील!!

महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची आवई भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील लोकांनी उठवली आहे. त्यांच्या जोडीला दिल्ली सरकारमधील अनुभवी शहाणेही सामील व्हावेत हे आश्चर्यच आहे. कधीकाळी ‘काँग्रेस’ गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपवाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत असे त्यांचे वर्तन आहे. मुंबईतील एका वृत्तवाहिनीचा मालक, संपादक असलेल्या अर्णब गोस्वामी यास एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. श्री. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी अलिबाग निवासी अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येशी संबंधित ही अटक आहे. नाईक यांनी मृत्यूपूर्वी जे पत्र लिहिलं त्यात गोस्वामी यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराचा, फसवणुकीचा संदर्भ आहे. त्याच तणावातून नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली. पण आधीच्या सरकारने गोस्वामी यांना वाचवण्यासाठी हे सर्व प्रकरण दडपले. त्यासाठी पोलीस व न्यायालयावर दबाव आणला. आपल्या पतीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी असा अर्ज नाईक यांच्या पत्नीने पोलीस व न्यायालयासमोर केल्यावर कायद्याने जे व्हायचे तेच झाले आहे.

गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात ‘आणीबाणी’ आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे? अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे. गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे.

भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मजा वाटते

त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे. आणीबाणीचा काळ ज्यांनी अनुभवला आहे त्यातले एक लालकृष्ण आडवाणी हयात आहेत व आणीबाणी काय होती हे सध्याच्या नवशिक्यांनी त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे.

कायद्यापुढे सगळे समान आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत दाखवली होती. त्या निर्णयातूनच आणीबाणीची बीजे रोवली गेली. ही निवड रद्द करताना न्या. सिन्हा आपल्या निकालपत्रात म्हणतात, ‘‘मला याखेरीज दुसरा कोणताही निष्कर्ष काढता येणे शक्य नाही. कायद्याच्या चौकटीत पंतप्रधानांसाठी ‘खास’ तरतूद नाही. साहजिकच मला याहून वेगळा ‘निर्णय’ देता येणे अशक्य आहे.’’ हा आमचा कायदा आणि न्यायाची चौकट आहे. कायद्याने पंतप्रधान इंदिराजी, नरसिंह राव यांनाही सोडले नाही. अनेक मंत्र्यांना गजाआड जावे लागले. कायद्याच्या कारवाईला सामोरे जाऊन अमित शहादेखील तावून सुलाखून बाहेर पडले आहेत. मोदी यांनी बिहारात कालच श्रीरामाच्या जयजयकाराच्या घोषणा केल्या. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन केले.(Shivsena Criticism on Arnab Goswami Arrest)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी: अर्णव गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.