PM Modi on Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि सल्ला मागितला’, मोदींनी पहिल्यांदाच केला गौप्यस्फोट
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान करणारच. ते माझे शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संबंधित वक्तव्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत देशभरातील विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या आपल्या नात्याबाबत वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजारी पडले होते. त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेपूर्वी उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना फोन करत सल्ला मागितला होता, असा खुलासा खुद्द मोदींनी मुलाखतीत केला. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत सविस्तर भाष्य केलं.
“उद्धव ठाकरे आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या”, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत केला.
‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत’
“बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझे शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेन, एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहेत. त्यासाठी मी जगेन. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन”, असंदेखील मोदी यावेळी म्हणाले.