Farm Laws | सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही, हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणालं?

| Updated on: Nov 19, 2021 | 10:23 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एक ऐतिहासिक असा निर्णय घेत तीनही वादग्रस्त कृषी कायदे (Withdraws 3 Farm Laws ) मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागतो, असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

Farm Laws | सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही, हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणालं?
Farmers Protest
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एक ऐतिहासिक असा निर्णय घेत तीनही वादग्रस्त कृषी कायदे (Withdraws 3 Farm Laws ) मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागतो, असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

पंतप्रधान मोदींच्या या घोषणानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर, कायदे मागे घ्यायला इतका उशिर का केला, असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे.

हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे – शेतकरी नेते राजू शेट्टी

“दीर्घ काळापासून हे आंदोलन सुरु होतं. येत्या 25 तारखेला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार होतं. अखेर सत्याचा विजय झाला. ज्या पद्धतीने आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन पुढे रेटलेलं होतं, शेतकरी घर दार सोडून सत्याग्रह करत होते, या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या आंदोलनात हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न झाला. तरीही शेतकरी आपल्या मुद्यावर ठाम राहिले”, असं शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत करताना सांगितलं.

“हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे. पंतप्रधानांनी उशिरा का होईना हा निर्णय जाहीर केला, मी त्याचं स्वागत करतो. शेवटी देश सर्वांना सोबत घेऊन चालवायचा आहे. समाजातील कोणीही एक घटक नाराज राहिला तर समाजात अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही’ – नवाब मलिक

“पंतप्रधान मोंदींनी देशाला संबोधित करताना कृषी क्षेत्रात काय कामगिरी केली त्याची माहिती दिली. त्यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. वर्षभरापासून या देशातील शेतकरी लढत होते, त्यांनी आपले प्राण गमावले. शेतकऱ्यांनी प्राणांची आहुती दिली. मंत्र्यांनी गाड्या चढवून त्यांची हत्या केली. शेतकऱ्यांना खालीद आणि देशद्रोही या नावाने पुकारण्यात आलं. तरी देशातील शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला. हा शेतकऱ्यांचा विजय आहे”, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

“सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही. उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणुका पुढे आहेत. त्यामुळे त्यांना कळालं की आता या देशात परिवर्तन होणार आहे. आज जो निर्णय झालाय तो शेतकऱ्यांचा विजय आहे”, असंही ते म्हणाले.

600 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, याचं उत्तरही केंद्र सरकारने दयावं – विजय वडेट्टीवार

“फेर निवडणुकीत भाजपला फटका बसला. खरं तर इतका उशिर का केला कायदा रद्द करायला. 600 शेतकऱ्यांचा बळी का घेतला. हेच जर पूर्वी केलं असतं तर शेतकऱ्यांमधील उद्रेक थांबला असता. ग्रामीण भागात या सरकारविरोधात प्रचंज रोष आहे. ग्रामीण भागातील जनता पेटली आहे. या कायद्यांविरोधात जी भुमिका या आंदोलनकर्त्यांनी मांडली, आंदोलनं केली. यांना सत्तेतील कोणताही नोता भेटायला जाऊ शकला नाही”, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

“600 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, याचं उत्तरही केंद्र सरकारने देणं गरजेचं आहे. या मृत्यूंची जबाबदारी आपल्यावर घ्या. कायदे रद्द केल्याचं स्वागत. पण, हे कायदे करुन देशातील शेतकऱ्याला वेठीस धरलं गेलं होतं, त्याला कोण जबाबदार”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या एकतेचा हा विजय – बच्चू कडू

“या निर्णयाचं मी स्वागत करतो, हा शेतकऱ्यांचा विजय आहे. हा निर्णय राजकीय दृष्ट्या असला तरी तो शेतकऱ्याच्या प्रचंड आंदोलनाचा आणि त्यांच्या एकतेचा हा विजय आहे. आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो होतो. आता फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. अनेक धोरणं बदलावी लागतील. त्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. सरकारने नवीन धोरण तयार केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिली.

संबंधित बातम्या :

Breaking News: शेतकरी आंदोलनासमोर मोदी सरकार झुकलं, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, मोदींनी देशाची माफीही मागितली

Narendra Modi on Farm Law: केंद्रीय कृषी कायदे रद्द, सर्वात मोठी घोषणा करताना नरेंद्र मोदी काय म्हणाले?

PM Modi आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते : पंतप्रधान मोदी