… तर आंबेडकर आणि वंचितच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागत : संजय राऊत
"प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावलं हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर नव्या दिंडीयात्रेचं स्वागत असं," मत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलं आहे.
मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपूर आंदोलनाचं स्वागत करताना काही टोलेही लगावले आहे (Sanjay Raut Saamana editorial on Prakash Ambedkar). “प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावलं हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर नव्या दिंडीयात्रेचं स्वागत असं,” मत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यात संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर आणि भाजपचं साटंलोटं असल्याच्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचंही म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात नामदेव पायरीचंही दर्शन घेतलं. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलींचे दर्शन घेऊन केला. कपाळाला बुक्का, चंदन लावून आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावलं हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागतच करावं लागेल.”
सरकार जर निर्णय घेत नसेल तर जनतेने निर्णय घ्यायचा असतो.सरकारने सुरुवातीलाच वारकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर आंदोलनाची वेळ आली नसती. @rautsanjay61यांनी आजच्या आंदोलनावर केलेलं वक्तव्य म्हणजे त्यांचा अभ्यास पूर्ण नाहीये. लोकशाहीत सरकारने कृती केली नाही की,जनता ती करते.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 31, 2020
“मंदिरासंदर्भात प्रकाश आंबडेकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो. हा निव्वळ योगायोग समजायला हवा. आंबेडकर आणि भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात आणि शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
“पोलिसांनी संयम राखून वातावरण बिघडवायचा डाव उधळला”
संजय राऊत म्हणाले, “आंबेडकरांनी पंढरपुरात गर्दी जमवली आणि ती गर्दी मंदिरासमोरचे बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी पोलिसांनी कोणताही बलप्रयोग केला नाही. पोलिसांनी संयम राखला हे महत्त्वाचे. पोलिसांनी लाठी जरी उगारली तरी वातावरण बिघडवायचेच हा डाव त्यामुळे उधळला गेला.”
“गर्दीत एकमेकांच्या संपर्कात आल्यावर कोरोना होतो हा गैरसमज यानिमित्ताने संपवायचा आहे, असं पंढरपुरात सांगण्यात आलं. असं सांगणं म्हणजे संपूर्ण डॉक्टर क्षेत्राला आणि जागतिक संघटनेलाच आव्हान आहे. आंबेडकर बौद्ध धर्माचे उपासक आहेत, पण राज्यातील वंचित बहुजन आघाडीचं ते नेतृत्व करतात. जे देश बौद्धधर्मीय आहेत त्या देशांमध्येही बौद्ध प्रार्थनास्थळांमध्ये लोकांना प्रवेस नाही अशी स्थिती आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
‘वंचित बहुजन आघाडीने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला का?’ प्रकाश आंबेडकर म्हणतात…
‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन
Prakash Ambedkar | पंढरपूर मंदिर प्रवेशानंतर प्रकाश आंबेडकर यांचं संपूर्ण भाषण
Photos | प्रकाश आंबेडकर मंदिर प्रवेशावर ठाम, पंढरपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
संबंधित व्हिडीओ :
Sanjay Raut Saamana editorial on Prakash Ambedkar