Sharad Pawar : इंडिया आघाडीत फूट? डीएमके आघाडीतून बाहेर पडणार… शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, एवढी टोकाची…
DMK (स्टॅलिन) काँग्रेसच्या तामिळनाडूतील भूमिकेवर तीव्र नाराज आहे. थलपती विजय यांच्या पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आघाडी धर्म मोडल्याचा DMK चा आरोप आहे. या नाराजीमुळे DMK ने 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी करत टोकाचा निर्णय न घेण्याचं आवाहन केलं आहे, दिल्लीतील बैठकीपूर्वी समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे सर्वेसर्वा स्टॅलिन हे काँग्रेसच्या तामिळनाडूतील भूमिकेवर नाराज आहेत. काँग्रेसने थलपती विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्याने आघाडी धर्म न पाळल्याचा आरोप डीएमकेने काँग्रेसवर केला असून डीएमकेने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्याबाबतचं सुतोवाच केलं आहे. मात्र, डीएमकेची समजूत काढली जाणार आहे. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. निवडणुकीच्या आधी आम्ही सर्व एकत्र आलो होतो. त्यात थोडा बदल झाला आहे. विशेषत: डीएमके आघाडीच्या बाहेर पडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आज इंडिया आघाडीची मिटिंग आहे. आम्ही पुन्हा आठ दहा दिवसांनी प्रमुख लोकांना बोलवून त्यातून मार्ग काढू. मार्ग निघेल याची खात्री आहे. आजची आढावा मिटिंग आहे. या बैठकीत कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असं सूत्र ठरवलं जाणार आहे. राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या मिटिंगला गेल्या आहेत. संध्याकाळपर्यंत त्याचं आऊटकम कळेल. त्यानंतर दिल्लीत बसून त्यातून मार्ग काढून काम करू, असं शरद पवार म्हणाले. तीन वर्ष निवडणुका नाही. त्यामुळे जे हातात आहेत, त्या सर्वांना सोबत ठेवायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
तशी भूमिका नको
यावेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्जमाफीच्या त्यात अटी आहेत. त्या अडचणीच्या आहेत. पण सरकार जेव्हा निर्णय घेतं तेव्हा त्याचं सूत्र लोकांना मान्य नसतं. पण सरकार निर्णय घेत असतं. अशावेळी लोकशाहीत सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती करणं याची आवश्यक असतं. मी एवढेच सांगेल, मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी बोलून कर्जमाफीचा जो निर्णय घेतला, त्यातील अटी कशा दुरुस्त होईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे. कर्जमाफीच्या मुद्द्यात त्यात काही कमतरता आहे म्हणून तो फेकून द्या, ही भूमिका घेण्याची शक्यता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
माझ्याकडे रिपोर्ट आलाय. केळी आणि ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. तज्ज्ञांची एक टीम आम्ही पाठवली होती. वसंतदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यांनी पाहणी केली. काय करायची गरज आहे, याचे लेखी निवेदन आमच्याकडे आलं आहे. शास्त्रज्ञ येऊन गेले. बघूया. ते काही आमच्या हातात नाही, असंही शरद पवार म्हणाले.
