सचिन अहिर यांनी सोडली साथ, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Aaditya Thackeray on Sachin Ahir : सचिन अहिर हे आमदार आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. आज सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरला. सचिन आहिर यांनी अर्ज भरला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. सचिन अहिर हे आमदार आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. आज सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘गेले चार वर्षे आम्ही पाहतोय की, ज्यांना सगळं काही मिळतं ते स्वत:च्या स्वार्थासाठी निघून जात आहेत. हे आम्ही गेल्या काही काळापासून पाहत आहे, त्यामुळे यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. वरळी-शिवडी हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. आमचं तिकडचं काम बोलतं, त्यामुळे कुणी येण्याने किंवा जाण्याने धक्का काही बसत नाही. मात्र एकच दुर्दैवाच आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, त्यांना अजून काय पाहिजे? ते असही नाही म्हणू शकत की आदित्य ठाकरे भेटतच नाहीत. ते स्वत: आमदार आहेत, त्यांच्या मुलीला प्रभाग समिती दिलेली आहे. आमदार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेतेपद आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे असा प्रश्न पडत आहे. आम्ही यांना काही कमी दिलेलं नाही, आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? कोणी जाण्याने काहीही फरक पडत नाही.’
हे ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस – आदित्य ठाकरे
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. हे अभ्यासातून लक्षात आलं आहे. हे ऑपरेशन फडणवीस आहे. हे लक्षात आलं आहे. सकाळी त्यांनी मेसेज पाठवला वरळीतून उभा राहणार नाही. हे म्हणण्याच्या गोष्टी आहेत. उभे राहिले तरी काही फरक पडत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना सवाल आहे, आज उपसभापती डोक्यावर बसला. तुमच्यातील का नाही बसला. हा भाजपने विचार केला पाहिजे. हे ऑपरेशन फडणवीस आहे.
कारवाई करणार
आदित्य ठाकरे यांनी अहिर यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देताना म्हटले की, ‘जी कारवाई असेल ती आम्ही करू. भाजपचे कार्यकर्ते घरदार सोडून काम करतात. त्यांना उच्च पद का मिळत नाही. सत्तेपासून दूर का ठेवत आहात. एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुम्हाला कार्यकर्त्यांना पुढे आणायचे नसेल. पहिली आमदारकी सुनील शिंदेंना मिळाली होती. ज्यांना ज्यांना शब्द दिला ते पाळले. खासदारकी, आमदारकी नगरसेवकपद दिलं. तुम्ही निष्ठेचा शब्द पाळला का. तुम्ही तो शब्द पाळला नाही.
