Uddhav Thackeray : औरंगाबादचा पाणी प्रश्न ते काश्मिरी पडितांच्या हत्या, उद्धव ठाकरेंनी भाजपला सोलून काढलं, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मुद्दे वाचा सविस्तर

हिंमत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा. मर्द असाल तर पहिले काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा', असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं. त्याचबरोबर अन्य मुद्द्यावरुनही त्यांनी भाजप आणि विरोधकांवर हल्ला चढवला.

Uddhav Thackeray : औरंगाबादचा पाणी प्रश्न ते काश्मिरी पडितांच्या हत्या, उद्धव ठाकरेंनी भाजपला सोलून काढलं, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मुद्दे वाचा सविस्तर
उद्धव ठाकरे, शिवेसना पक्षप्रमुखImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 9:50 PM

औरंगाबाद : पाणी प्रश्न, औरंगाबादचं नामांतर, बाबरी मशिद, काश्मिरी पंडित, हिंदुत्व, महागाई, राज ठाकरेंची टीका अशा अनेक मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतून (Aurangabad) भाजप आणि मनसेवर जोरदार हल्ला चढवला. औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेला राज्यभरातून हजारो शिवसैनिक औरंगाबादेत दाखल झाले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. ‘काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandit) पुन्हा घरं सोडली आहेत. घरात, शाळेत जाऊन गोळ्या घातल्या जात आहेत. हिंमत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा. मर्द असाल तर पहिले काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा’, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं. त्याचबरोबर अन्य मुद्द्यावरुनही त्यांनी भाजप आणि विरोधकांवर हल्ला चढवला.

‘ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते’

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता, बंधू आणि भगिनिंनो अशा नेहमीच्या रुपात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणा सुरुवात केली. ‘आज शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यानंतर मुंबईबाहेर पाऊल टाकलं आणि सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनाप्रमुखांच्या लाडक्या संभाजीनगरात आलोत. जिकडे पाहावं तिकडे लोकच लोक आहेत. संभाजीनगरची पहिली महापालिका जिंकलो तेव्हा इथली सभा मी बाजूच्या इमारतीवरुन पाहत होतो. इतका काळ लोटला पण आजही तोच उत्साह, तोच भगवा दिसतोय. आपल्याकडे आता मैदान पुरत नाही अशी आपली ताकद वाढत आहे. आज आपल्या रुपात तुळजाभवानीचं दर्शन घेत आहेत. त्याच आईने आपल्याला विचार आणि साथी, सवंगडी आणि मर्द दिले आहेत.

औरंगाबादचा पाणी प्रश्न

मी रस्त्याने येताना वाचलं की हिंदुत्वाची तोफ धडाडणार पण ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. ती ढेकणं आम्ही अशीच चिरडत असतो. तिकडे मला माझ्या सैनिकांची शक्तीही वाया घालवायची नाही. मी आज पहिल्यांदा मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करणार आहे. हिंदुत्वाचा तर आहेच, ते तर आमच्या धमन्यांमध्ये आहे. पण मुद्दाम मी संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मीच एकटा मूर्ख असेल तिकडे पाणी प्रश्न असतानाही जनतेला सामोरा जात आहे. याचं काण कुठेही फसवेगिरी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. तुमच्या मनात हा प्रश्न असेल की तुम्ही सांगता ते आम्ही ऐकतो पण तुमचं वर्क्तृत्व आमच्या काय कामाचं? पण आता फरक पडला की नाही ते तुम्हीच सांगायचं आहे. जुनी एक योजना आहे 1972 ची ती गंजून गेलीय, तिच्यासाठीही पैसे देतोय. समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन मी केलं होतं. दुर्दैवानं कोरोनामुळे एक वर्ष गेलं. पण मी केंद्रेकरांना सांगितलं आहे की हातात दंडा घ्या आणि आडवा येईल त्याला सरळ करा. पण आता स्टिलच्या किंमती वाढल्या आहेत. पण मी एक पैसा त्या योजनेला कमी पडू देणार नाही. कंत्राटदार काम करत नसेल तर त्याला तुरुंगात टाकण्याचे आदेश मी दिले आहेत. कालही वाईल्ड लाईफची एक बैठक घेतलीय. जायकवाडीत विहिरीसाठी त्यांची परवानगी लागते.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांच्या जलआक्रोश मोर्चावर निशाणा

मध्ये कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला. तो आक्रोश त्यांचा सत्ता गेली होती म्हणून होता पाण्यासाठी नव्हता. मागचे पाच वर्षे तुम्हीच होता. आम्ही फक्त त्यांच्यासोबत होतो. खोटं बोलणं हे आम्हाला शिकवलेलं नाही. रस्त्यासाठी आम्ही निधी दिला आहे. तीन चार वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते. अजूनही पूर्ण काम झालेलं नाही. पण सुधारणा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला. अगदी मेट्रोची गरज लागली तर त्यासाठी प्लान बनवण्याची सुरुवात केली आहे. मेट्रो शहराची विद्रुपीकरण करणारी नसेल. विध्वंसक विकासकाम आम्ही केलेलं नाही आणि होऊ देणार नाही. संभाजीनगरची शान जाईल असं मी काही करणार नाही.

औरंगाबादचं नामांतर

संभाजीनगर कधी करणार? हे त्यांनी सांगायचं का आपल्याला. माझ्या वडिलांनी शिवसेनाप्रमुखांनी वचन दिलं आहे. ते मी कधी विसरणार नाही. पण विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे. एक सुरुवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करा असा प्रस्ताव मी दिला आहे. तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर प्रस्ताव मंजूर करा. या शहराचं नामांतर नाही तर छत्रपती संभाजीराजेंना आदर्श वाटेल असं शहर मी करणार आहे. फक्त नाव बदलून चालणार नाही. नावं दिलं आणि पाणी नसेल, नाव दिलं आणि रस्ते नसतील तर संभाजीराजे म्हणतील चल तुला रायगडावरील टकमकटोक दाखवतो. विमानतळाचं नाव संभाजीराजेंच्या नावाने द्या आम्ही तुमचा सत्कार करतो, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्लाबोल

रुपया खाली घसरतोय पण आम्हाला चिंता कोणती तर कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे. आमचं हिंदुत्व मोजण्याची मोजपट्टी तुम्हाला कुणी दिली? चला होऊन जाऊद्या. शिवसेनेनं हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपनं काय केलं हे एकदा खुल्या मंचावर होऊन जाऊद्या. आता फडणवीस सांगत आहेत बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते. मग मला सांगा संभाजीनगरचे मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते का? नव्हते गेले तर तुमच्याकडे आलेले त्यांचे चिरंजिव अतुल सावे यांनी सांगावं की मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते. कुणाला हिंदुत्व शिकवताय. बाबरी पडल्यानंतर आडवणी, अटलजी यांचं स्टेटमेंट आहे. हा इतिहास काही वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली नसती, अमरनाथ यात्रेवर गंडांतर आलं, काश्मिरी पंडितांच्या मागे शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते तर दिल्लीच्या तख्तावर आज तुम्ही हिंदुत्वाच्या जोरावर बसले असता काय?

काश्मिरी पंडितांनी पुन्हा घरं सोडली आहेत. घरात, शाळेत जाऊन गोळ्या घातल्या जात आहेत. हिंमत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा. मर्द असाल तर पहिले काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा. ही शिवसेना बाळासाहेबांची नाही म्हणे, मग कुणाची आहे? उद्धव ठाकरे म्हणून मी शून्य आहे. पण आज बाळासाहेबांमुळेच ही शिवसेना आहे आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.

बाबरीच्या जागेवर मंदिर बांधायचं धाडस तुम्ही केलं नाही. कोर्टातून आदेश आल्यानंतर तुम्ही जनतेसमोर झोळ्या पसरवल्या. मग तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं? आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपचे जे बेलगामपणे सुटलेले प्रवक्ते आहेत त्यांच्यावर लगाम घालावा. तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली तर आमचाही संयम सुटेल. तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल. हा भगवा फडकवायला बरा म्हणून घेतलेला नाही. हा वारकऱ्यांचा, छत्रपतींचा, हिंतुत्वाचा भगवा आहे. इकडे हनुमान चालिसा बोलायची आणि तिकडे जाऊन शिव्या द्यायच्या हे बरोबर नाही.

‘अरब राष्ट्रांनी आपल्याला गुडघ्यावर आणलं’

शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा मुसलमान द्वेष करा असं कधीही सांगितलं नाही. शिवाजी महाराजांनीही अन्य धर्माचा आदर केला आहे. बाळासाहेबांनीही देश हाच माझा धर्म म्हणून बाहेर पडण्यास सांगितलं. पण धर्माच्या नावाने आमच्या अंगावर कुणी आला तर सोलल्याशिवाय राहणार नाही. भाजपच्या कोणत्या प्रवक्त्याने प्रेषितांचा अपमान केल्यानंतर अरब राष्ट्रांनी आपल्याला गुडघ्यावर आणलं. देशानं काय केलं आहे, देशानं का माफी मागायची? भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेनं जा पुढे. आज मी तुम्हाला जाहीरपणे विचारतो ज्या भाजपच्या तिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली ते तुम्हाला मान्य आहे का? अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि आम्ही तुमच्या मागे फरफटत यावं हे होणार नाही.

भाजपनं मध्ये एक सभा घेतली होती, त्यात भगव्या टोप्या घालून आले होते. टोपीत हिंदुत्व नसतं. मग संघ का काळ्या टोप्या घालतो? तेव्हा मला विचारलं तुम्ही संघावर का टीका केली. मी संघावर टीका केली नाही. पण तुमच्या कार्ट्यांनी आज काय सुरु केलं ते पाहा. सरसंघचालकांनी आज जी भूमिका घेतली त्याचं मी स्वागत करतो. प्रत्येक मशिदीखाली हिंदुत्व शोधायची गरज नाही, ते योग्यच आहे. पंतप्रधानांनी चांगलं सांगितलं की आपल्या देशात विरोधी पक्ष मूळ मुद्द्यांना बगल देऊन वेगळ्याच मुद्द्यावर बोलतोय. बरोबर आहे, पण त्यांना माहिती नाही का की महाराष्ट्रात विरोधी पक्ष त्यांचा भाजप आहे. भाजप इथे कुणाला तरी सुपारी देतो, मग भोंगे आठवतात, हनुमान चालिसा आठवते.

आज काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. असाच एक सैनिक होता तो सैनिक आपल्या देशाकडून लढत होता. त्याने अनेक अतिरेकी मारले होते. तो सुट्टीवर निघाल्यानंतर त्याचं अपहरण झालं. काही दिवसानंतर त्याचा छिन्नविछिन्न झाले मृतदेह सापडला. त्याचं नाव होतं औरंगजेब. तेव्हा तुम्ही तो आमचा नाही तो मुसलमान आहे असं म्हणणार आहात का?

मुंबई ते नागपूर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण जालन्याला जोडतो आहोत. परभणी आणि धारिशव वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. संभाजीनगरमध्ये संत विद्यापीठ, पुरातन मंदिरांचं जनत, गड किल्ल्याचे जतन करतो आहोत. असे विचार तुमच्या मनाला कधी शिवले तरी होते का?

‘मित्र हाडवैरी बनला आणि शत्रू मित्र बनले’

रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार असं वाटत होतं. पुन्हा येणार म्हणत होते. त्यांना कळलंही नाही की या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत, इतके दिवस ज्यांच्याविरोधात आपण लढत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली. मित्र हाडवैरी बनला आणि शत्रू मित्र बनले आहेत. एक जमाना होता जेव्हा शिवसेना आणि भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात अपृश्य होता. कारण आपण हिंदुत्वावर लढत होतो. कठीण काळात तुम्हाला शिवसेना लागली आणि आज केंद्रात सत्तेत आल्यानंतर तिच शिवसैना तुम्हाला वैरी भासू लागली. मग काढा तुमचे मित्र पक्ष. आधी किती आणि आता किती राहिले याचा आराखडा मांडा.

इतकी वर्षे ज्यांनी तुम्हाला सांभाळलं जोपासलं. मला आजही आठवतं एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. म्हणाले यावेळी आम्हाला महापौरपद द्या. बाळासाहेबांनी एका क्षणात सांगितलं ठीक आहे तुमचा महापौर ते आकडेमोड करत बसले नाहीत. तेव्हा हेच भागवत कराड महापौर झाले. आज ते दिल्लीत गेले आहेत.

‘आक्रोश करायचा असेल तर दिल्लीत जा’

आक्रोश करायचा असेल तर दिल्लीत जा. पीकविमा कंपन्यांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे? योजना अशा आणायच्या की शेतकरी नागवायचा. ज्या ज्या वेळेला अवकाळी येते तेव्हा आम्ही तुमच्या बांधावर येतो. तुम्ही भुलता. मग आम्ही सत्तेत येतो आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं आम्ही विसरतो. मला सांगा अच्छे दिन आले का ओ… निवडून आलं की पुन्हा धर्माचं राजकारण, कुठलीही तरी मशिद काढायची. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की देशातील प्रमुख पक्षांना, मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि सांगा की कोणत्या मुद्द्यावर बोलायचं आणि सांगायचं. उज्ज्वला योजनेत गॅस सिंलिंडर मिळत नव्हता. बोंबाबोंब सुरु झाली की पुन्हा ही योजना सुरु केली. पेट्रोल-डिझेलबाबतही तसंच आधी किंमत वाढवायची आणि लोक ओरडायला लागले की थोडे कमी करायचे.

काश्मिरी पंडितांवरुन भाजपवर टीकास्त्र

अनेक गुंतवणूकदार येत आहेत. पण ते येऊ नये म्हणून भाजप आक्रोश करतोय. हे कमी पडतय म्हणून की काय कुण्याच्या मागे ईडी लाव, सीबीआय लाव. इकडे ईडी, सीबीआय लावण्यापेक्षा तिकडे काश्मिरमध्ये जा. संताप कुठे येतो, चिड कुठे येते जेव्हा काश्मिरमध्ये काश्मिरी पंडित बाहेर पडत आहेत. तेव्हा कुणी मायचा पुत भाजपचा प्रवक्ता बोलत नाही. पण शिवसेनाप्रमुखांचा पुत्र, महाराष्ट्राचा मुलगा म्हणून मी जबाबदारी स्वीकारतोय. त्यांना महाराष्ट्रात आसरा देणार. मला आठवत आहेत ते दिवस कुठेही दहशतवादी हल्ला झाला की भाजप, शिवसेना रस्त्यावर उतरत होती, बंद, संप करत होतो… पण आज बंद नाही, महागाई वाढली तरी संप नाही. भाजपमध्ये बंद करण्याची ताकद नाही. त्यांनी बंदचा दिवस निवडला तो गणपतीच्या आगमनाचा पहिला दिवस होता. बाळासाहेबांनी सांगितलं हिंदुंचा सण आहे त्या दिवशी संप करायचा नाही. मी सुषमाजींना फोन केला आणि आम्ही संपात सहभागी होणार नाही हे सांगितलं. तेव्हा तुम्हाला हिंदुंचे सणही दिसत नव्हते.

‘पिढ्या जातील पण शिवसेनेची मुळं उपटू शकणार नाहीत’

तेव्हा सात पैशांनी पेट्रोल वाढलं तर अटलजी बैलगाडीत बसून लोकसभेत गेले होते. कुठे आहे ती भाजप? मला प्रश्न विचारायचा आहे कराड साहेबांना हेच तुम्हाला अपेक्षित होतं काय. तुमचे प्रवक्ते बडबड करत आहेत तेच तुम्हाला अपेक्षित आहे का? देशाची अब्रु जातेय, भाजपची जात नाही. तुम्ही ज्या दिशेनं जात आहात, कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान, महाराष्ट्र माझा? तुम्ही हिंदुत्वाला बदनाम करताय, शिवसेनेला बदनाम करु शकत नाहीत. तो तळागाळात पोहोचलाय. तुम्ही शिवसेनेची पाळमुळं उपटायचा प्रयत्न केला तर तुमच्या पिढ्या जातील पण शिवसेनेची मुळं उपटू शकणार नाहीत.

‘हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व’

आमच्या हृदयात राम जरूर आहे पण आम्ही हाताला काम देऊ शकलो नाही तर त्या हिंदुत्वाला काडीची किंमत नाही. म्हणून हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व आहे. एकच सांगेन आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करु नका. आमचे हात ढेकणं चिरडण्यासाठी नाही. तर हिंदुत्वाचं रक्षण करणारे आमचे हात आहे. जो या देशासाठी जगायला, मरायला तयार आहे तो आमचा आहे आणि त्यांचं रक्षण करणं हे आमचं काम आहे, असं आमचं हिंदुत्व आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.