शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो, सुप्रिया सुळेंवर या नेत्याची जहरी टीका…
हे इंडिया मधल्या लोकांचे लग्न होते, आम्ही भारतामधले लोकं आहोत. खासदार असणारी व्यक्ती अशी वागत असेल तर आम्ही यावर काय व्यक्त करावं अशीही टीका नेत्याने केली.

माजलगावामध्ये एका नगरसेविकेचे कुणबी सर्टिफिकेट जात पडताळणी समितीने रद्द केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की ही प्रमाणपत्रे रद्द करावेत अशी मागणी ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी केली आहे. प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांनी समित्यांवर दबाव टाकण्याचे काम केले आहे. बोगस जात प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की ही जशी रस्त्यावरची लढाई आहे तशी न्यायालयात जाऊन ही लढाई लढावी लागेल. जात प्रमाणपत्र देत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्राचे रेट ठरले आहेत. बेकायदेशीरपणे ज्यांनी जात प्रमाणपत्र दिले आहे त्यांचे निलंबन झाले पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्या 58 लाख नोंदी मिळाल्या असे सांगितले जाते तेव्हा बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्याला वाव मिळतो.ओबीसींना सवतीच्या लेकरांसारखं का वागताय मुख्यमंत्री साहेब. शासन आम्हाला गृहीत धरतंय असेही ते खेदाने म्हणाले.
प्रसाद लाड यांचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही.आरक्षणाबाबत लाड यांना कुठलीही अक्कल नाही किंवा ज्ञान नाही. हे त्यांच्या आकलनाच्या बाहेरचे आहे. लाड यांनी जाऊन जरांगेंना विनवणी करणं हा मोठा जोक आहे. लाड यांना अधिकाऱ्यांना फोन करण्याचा अधिकार कोणी दिला. मग तुम्ही दबाव टाकता का? आमदार प्रसाद लाड यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे असेही प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ नाराज असतील नसतील तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे.ओबीसी संदर्भात त्यांच्या मार्गदर्शनाची आजही आम्हाला आवश्यकता आहे. भुजबळ साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, आमचे कान धरले पाहिजेत. आम्ही चुकीचे बोलत असू तर भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगितले पाहिजे असेही हाके यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर केला पाहिजे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती सध्या आहे.रोहित पवार यांनी दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करावी. पाचव्या दिवशी मी रोहित पवारांना भेटायला जाणार होतो पण तिसऱ्या दिवशीच त्यांनी आंदोलन गुंडाळलं असा टोमणाही रोहित पवार यांना हाके यांनी लगावला आहे.
मायबाप सरकारला विनंती आहे
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलावं अशी मायबाप सरकारला विनंती आहे. शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो. खासदार असणारी व्यक्ती जर अशी वागत असेल तर काय आम्ही यावर व्यक्त व्हावं. हे इंडिया मधल्या लोकांचे लग्न होते, आम्ही भारतामधले लोकं आहोत. पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने शेतकऱ्यांना आश्वस्त करावे आणि कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
