कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अजित पवारांचे आदेश
कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले (Ajit Pawar on Corona).
पुणे : “कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची (Ajit Pawar on Corona) माहिती समोर येत आहे. ही बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी”, असा आदेश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असादेखील आदेश त्यांनी दिला आहे (Ajit Pawar on Corona).
पुणे येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना अनेक निर्देश दिले.
“एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळायचा आणि दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करुन अर्थचक्राला गती आणायची, हे आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी नागरिकांचा बेशिस्तपणा दिसतो. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाई नियमितपणे करावे”, असा आदेश अजित पवारांनी दिला.
“लॉकडाऊन संदर्भातील नियम, केंद्र आणि राज्य शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना, तसेच पुणे जिल्हा आणि शहरातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी नियोजन करावे”, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. रोजगार उपलब्धेतसाठी उद्योग-व्यवसाय सुरु करुन जनजीवनात सुरळीतता आणणे गरजेचे आहे.स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग, व्यवसाय सुरु करताना सुरक्षितताही सांभाळली पाहिजे. हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना त्यानी सबंधित यंत्रणांना दिल्या.
“विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून आणि निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा आणि केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ. शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेण्यात येईल”, असं अजित पवार म्हणाले.
“ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामुग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावाना मंजुरी देण्यात येईल. राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल”, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
महापूर विरुद्ध चक्रीवादळ, फडणवीसांकडून मदतीची आठवण, NDRF स्टँडिग ऑर्डरचा दाखला
मुंबईकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट