Mahashivratri 2026 :15 की 16 फेब्रुवारी, महाशिवरात्रीचा उपवास कधी करावा? पूजा आणि अभिषेक करण्याची वेळ काय?
२०२६ मध्ये महाशिवरात्री कधी आहे? १५ की १६ फेब्रुवारी? जाणून घ्या महाशिवरात्रीची अचूक तारीख, पूजेचे चार प्रहर, अभिषेक विधी आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व.

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणून महाशिवरात्रीला ओळखले जाते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. २०२६ मध्ये महाशिवरात्रीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये काहीसा संभ्रम आहे. शास्त्रानुसार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री साजरी करणे सर्वात शुभ ठरेल. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
१५ फेब्रुवारीलाच महाशिवरात्री का?
पंचांगानुसार, चतुर्दशी तिथीची सुरुवात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०४ वाजता सुरु होत आहे. या तिथीची समाप्ती १६ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३४ वाजता होणार आहे. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये निशीथ काळ म्हणजेच मध्यरात्रीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा योग १५ फेब्रुवारीच्या रात्री आहे. त्या शास्त्रानुसार याच दिवशी महाशिवरात्री व्रत आणि पूजा करणे फलदायी मानले जातं आहे.
पूजेचे चार प्रहर आणि अचूक वेळ
महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहारांत महादेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. प्रत्येक प्रहरात विशिष्ट वस्तूचा अभिषेक केला जातो.
- प्रथम प्रहर: सायंकाळी ६:१५ ते रात्री ९:२५ (दुधाचा अभिषेक)
- द्वितीय प्रहर: रात्री ९:२५ ते मध्यरात्री १२:३५ (दह्याचा अभिषेक)
- तृतीय प्रहर: मध्यरात्री १२:३५ ते पहाटे ३:४५ (तुपाचा अभिषेक)
- चतुर्थ प्रहर: पहाटे ३:४५ ते सकाळी ६:५५ (मधाचा अभिषेक)
- विशेष निशीथ काळ मुहूर्त: १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२:०९ ते १:०० या वेळेत केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते.
महाशिवरात्रीची पूजा कशी कराल?
- महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि उपवासाचा संकल्प करावा.
- त्यानंतर शिवलिंगावर सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा.
- दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने अभिषेक करून पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करावे.
- शिवाला प्रिय असलेले बेलपत्र, धतुरा, पांढरी मंदारची फुले, भस्म आणि अक्षता अर्पण कराव्यात.
- पूजा करताना ‘ओम नमः शिवाय’ किंवा ‘महामृत्युंजय मंत्राचा’ मनोभावे जप करावा.
- शेवटी शंकराची आरती करून पांढऱ्या मिठाईचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा.
आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीलाच भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. याच दिवशी शिवाने वैराग्य सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. शिवपुराणानुसार, याच रात्री महादेव पहिल्यांदा लिंगोद्भव रूपात (अग्नीस्तंभ किंवा ज्योतिर्लिंग) प्रकट झाले होते.
असे मानले जाते की, या रात्री विश्वातील आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत सक्रिय असते. या दिवशी केलेले ध्यान, जप आणि जागरण इतर दिवसांच्या तुलनेत हजार पटीने जास्त फळ देते. भगवान शिवाने हलाहल विष प्राशन करून जगाचे रक्षण केले, तो दिवसही हाच मानला जातो. काशी विश्वनाथ, उज्जैनचे महाकाल आणि सर्व शिवालयांमध्ये या दिवशी शिव तांडव स्तोत्र आणि रुद्राभिषेकाचा जयघोष भाविकांमध्ये चैतन्य निर्माण करतो.
