देवाचं दर्शन घेतल्यानंतर लोक मंदिराच्या गाभाऱ्यात का बसतात? अनेकांना माहिती नाही उत्तर, कारण…
प्रत्येकजण मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर काही वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात बसतो. पण यामागील काय कारण असतं? अनेकांना माहिती नाही उत्तर

आपण मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन घेतो, प्रदक्षिणा घालतो आणि त्यानंतर काही वेळ मंदिराच्या पायरीवर किंवा आवारात शांत बसतो. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. मात्र दर्शन झाल्यानंतर लगेच मंदिरातून बाहेर न पडता काही क्षण शांत बसण्यामागे केवळ विश्रांती नसून त्यामागे आध्यात्मिक, मानसिक आणि वैज्ञानिक कारणे असल्याचे मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार मंदिरांची रचना अशा ठिकाणी केली जाते, जिथे पृथ्वीच्या चुंबकीय लहरी अधिक सक्रिय असतात. मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या देवाच्या मूर्तीखाली अनेकदा तांब्याचा तुकडा बसवलेला असतो. हा तांबा त्या ठिकाणची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून साठवून ठेवतो असे मानले जाते.
जेव्हा भक्त मंदिरात जाऊन श्रद्धेने देवाचे दर्शन घेतो तेव्हा त्या वातावरणातील सकारात्मक ऊर्जा त्यांच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करते. त्यामुळे दर्शनानंतर लगेच बाहेर पडण्याऐवजी काही वेळ मंदिरात बसल्यास ती ऊर्जा शरीरात टिकून राहते आणि मन अधिक शांत व स्थिर होते असे सांगितले जाते.
मन शांत करण्यासाठी काही क्षण आवश्यक
मंदिराच्या गाभाऱ्यात हे आध्यात्मिक आणि भौतिक जग यांना जोडणारा एक प्रकारचा सेतू मानला जातो. त्यामुळे दर्शनानंतर काही मिनिटे शांत बसल्याने मनातील विचारांची गर्दी कमी होते. त्या काही क्षणांत व्यक्ती स्वतःच्या विचारांचे आणि कृतींचे आत्मपरीक्षण करू लागतो. मन स्थिर झाल्यावर जीवनातील समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ताकद मिळते.
धार्मिक ग्रंथांमध्ये मंदिरात बसून निरर्थक गप्पा मारण्याऐवजी प्रार्थना करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः हा श्लोक म्हणण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे:
अनायासेन मरणं, विनादैन्येन जीवनम् । देहान्ते तव सान्निध्यं, देहि मे परमेश्वरम् ॥
या श्लोकाचा अर्थ असा सांगितला जातो की, ‘हे परमेश्वरा, माझे जीवन परावलंबी नसावे, मृत्यू सहज आणि वेदनारहित व्हावा आणि शेवटच्या क्षणी तुझे सान्निध्य लाभावे.
मंदिरात दर्शनानंतर काही क्षण शांत बसणे ही केवळ धार्मिक परंपरा नसून मनाला शांतता देणारी आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा मिळवून देणारी प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे आजही अनेक भक्त दर्शन घेतल्यानंतर काही वेळ मंदिराच्या आवारात बसून प्रार्थना करतात आणि मगच घरी परततात.
