AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane | नगरच्या मातीची मेलबर्नमध्ये कमाल, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाने राहुल द्रविडची आठवण!

मुळचा अहमदनगरचा असलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Ajinkya Rahane | नगरच्या मातीची मेलबर्नमध्ये कमाल, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाने राहुल द्रविडची आठवण!
अजिंक्यने टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला.
| Updated on: Dec 29, 2020 | 2:57 PM
Share

मुंबई : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या (MCG Test) मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत शानदार विजय मिळवला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व होतं. रहाणेनेही त्याच ताकदीने आव्हान पेलून, आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली. रहाणेने या कसोटीत शतक ठोकून, कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्यामुळे भारताने हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. (Australia vs india 2nd test)  या कसोटीत रहाणेच्या नेतृत्त्वावर क्रिकेटप्रेमी फिदा झाले. रहाणेच्या खेळीने क्रिकेटप्रेमींना माजी कर्णधार राहुल द्रविडची आठवण आली. (aus vs india 2nd test mcg 2020 ajinkya rahane explosive performance at the melbourne cricket ground)

या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने पहिल्या डावात अवघ्या 195 धावात गुंडाळलं. मग फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताने टिच्चून खेळी केली. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे पाय रोऊन उभा राहिला आणि त्याने 112 धावांची खणखणीत खेळी केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 131 धावांची भरभक्कम आघाडी मिळाली. इथेच भारताच्या विजयाचा पाया रचला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 200 धावाच करता आल्या. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडी वगळता, भारताला विजयासाठी केवळ 70 धावांची गरज होती. भारताने या धावा केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात केल्या.

अजिंक्य रहाणेचं दमदार नेतृत्त्व

पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव, सलामीवीरांचा हरवलेला फॉर्म, मधल्या फळीतील आधारस्तंभ विराट कोहलीची अनुपस्थिती आणि शुभमन गिल, मोहम्मद सिराज यासारखे नवखे आणि पहिलीच कसोटी खेळणारे खेळाडू, या सर्व पार्श्वभूमीसह दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. कांगारुंचा जबरदस्त फॉर्म आणि त्यांचं घरचंच मैदान यामुळे भारतीय टीम आधीच बॅकफूटवर होती. मात्र याच कठीण प्रसंगात अजिंक्य रहाणेने लीडर कसा असतो, याची झलक दाखवली.

रहाणेने आधी गोलंदाजांना बळ दिलं, सांघिक भावना जोपासली. मग फलंदाजीत एक बाजू भक्कमपणे लावून धरली आणि लढत राहिला. रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडिया मजबुतीने लढली, त्यामुळेच पहिल्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे गेलेली टीम इंडिया, दुसऱ्या कसोटीत मात्र तगडी टीम म्हणून पाहायला मिळाली.

रहाणेसमोरची आव्हाने

या कसोटीत अजिंक्य रहाणेसमोर अनेक आव्हानं होती. शुभमन गिलसारखा नवखा सलामीवीर, बदललेला विकेटकीपर ऋषभ पंत, सर्वात अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीची कमी, त्यात विराट कोहलीची गैरहजेरी अशा बिकट परिस्थितीत टीमचं नेतृत्त्व रहाणेकडे आलं.

रहाणे जेव्हा टॉससाठी मैदानात उतरला, तेव्हा कुणीही ही मॅच भारत जिंकू शकेल, असा अंदाजही लावू शकले नसते. टॉस जिंकून कांगारु फलंदाजीसाठी मैदानात उतरले. रहाणेने आपल्या निर्णयक्षमतेची झलक, चहापानापर्यंतच दाखवली. महाराष्ट्रातील अहमदनगरच्या मातीत कसलेला खेळाडू कधीही कच खाणार नाही, हेच रहाणेने या कसोटीत दाखवलं.

योग्य वेळी योग्य गोलंदाजाची निवड

कुठल्याही गोष्टीत टायमिंगला महत्त्व असतं. अजिंक्य रहाणेनेही या कसोटीत टायमिंग साधलं. योग्य वेळी योग्य गोलंदाजाची निवड केली. त्याचाच परिणाम म्हणून जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेली ऑस्ट्रेलियाची टीम 195 धावात ढेपाळली. आपल्याकडे जसप्रीत बुमराह हे हुकमी अस्त्र आहे आणि ते चालणारच हे रहाणेला माहीत होतंच, पण त्याच्या जोडीला कोण हा प्रश्न होता. उमेश यादवकडे अनुभव होता, मात्र त्याला विकेट घेण्यासाठी झुंजावं लागत होतं. त्याचवेळी आर अश्विन आणि रवींद्रन जाडेजा ही चकवा देणारी जोडी योग्य प्रकारे वापरली तर काय होतं, ते रहाणेने या कसोटीत अधोरेखित केलं. बुमराहने पहिल्या डावात 4, अश्विनने 3 विकेट्स घेतल्या.

दुसरीकडे नवखा मोहम्मद सिराज सुरुवातीच्या काळात चालत नव्हता. त्याला गोलंदाजी देण्याची घाई रहाणेने केली नाही. नंतर मार्नस लाबुशेन ऐन रंगात आला असताना, सिराज आला आणि त्याला गिलकरवी झेलबाद करुन माघारी धाडलं. सिराजने पहिल्या डावात दोन विकेट्स घेतल्यामुळे, पुढच्या डावासाठी त्याचा आत्मविश्वास आपोआप वाढला.

माणसं पेरली

रहाणेने फिल्डिंग अशा पद्धतीने सजवली, जसं विस्कटलेली फुलं एकत्र गुंफून सुरेख माळ बनवावी. रहाणनेने लावलेल्या फिल्डिंगचं वर्णन करताना माजी क्रिकेटपटू मदनलाल म्हणाले, रहाणेने जिथे माणसं उभी केली, तिथंच ऑस्ट्रेलियन फलंदाज झेल देत गेले. म्हणजेच रहाणेने अक्षरश: माणसं पेरली.

रहाणेने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक खेळाडू स्टीव्ह स्मिथवर इतका दबाव टाकला, की तो जितका वेळ खेळपट्टीवर उभा राहिला, तितका वेळ तो चाचपडतच राहिला. रहाणेने स्मिथभोवती अक्षरश: कडं उभं केलं. ज्या क्रिकेटपटूला आयसीसीने कसोटीतील दशकातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवलं, तो फलंदाज रहाणेचं चक्रव्यूह भेदू शकला नाही.

तळाच्या फलंदाजांसाठी खास रणनीती

अजिंक्य रहाणेने तळाच्या फलंदाजांसाठी खास रणनीती आखली. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज कोसळल्यानंतर, तळाचे फलंदाज हात खोलत होते. रहाणेने त्याचवेळी रवींद्र जाडेजाच्या हाती गोलंदाजी सोपवली आणि फिल्डर्सना मागे उभे केलं. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते झेल सोपवून मोकळे झाले.

शांत, संयमी आणि सहकाऱ्यांना समजून घेणारा

अजिंक्य विराटच्या तुलनेत स्वभाावाने शांत आणि संयमी कर्णधार आहे, हे त्याने दाखवून दिलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. जाडेजा आणि रहाणे मैदानात खेळत होते. जाडेजा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर होता. अवघ्या एका धावेची गरज होती. 100 व्या ओव्हरमध्ये नॅथन लायनच्या गोलंदाजीवर जाडेजाने फटका मारला. नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या रहाणेला धावेसाठी कॉल दिला. रहाणेनी या कॉलला साद दिली. मात्र मार्नस लाबुशानेच्या अचूक थ्रो मुळे रहाणे आऊट झाला.

आपल्या चुकीमुळे रहाणे आऊट झाला, हे जाडेजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. बाद घोषित केल्यानंतर रहाणे डग आऊटच्या दिशेने निघण्याआधी जाडेजा जवळ गेला. जाडेजाने शर्मेने मान खाली घातली. मात्र अजिंक्यने त्याला प्रोत्साहन दिले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या कृतीमुळे रहाणेचं सर्वच स्तरातून कौतुक केलं गेलं. रहाणेने या कृतीतून कर्णधार कसा असावा, याचं दर्शन करुन दिलं.

संबंधित बातम्या :

Urmila Matondkar | “वेलडन अजिंक्य, देशाला तुमचा अभिमान”, रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकरकडून तोंडभरुन कौतुक

(aus vs india 2nd test mcg 2020 ajinkya rahane explosive performance at the melbourne cricket ground)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.