आयपीएल 2026 नंतर ऋषभ पंतसोबतच या 4 संघांच्या कर्णधारांना डच्चू मिळण्याची शक्यता, जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धा संपण्यापूर्वीच लखनौ सुपर जायंट्सने संघात साफसफाई सुरू केली आहे. ऋषभ पंतने कर्णधारपदावरून मुक्त करण्याची मागणी लगेच मान्य केली. असं असताना इतर फ्रेंचायझी देखील आपआपल्या संघात कर्णधारांना काढण्याची शक्यता वाढली आहे. चला जाणून घेऊयात...

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात सुमार कामगिरी केली. त्यामुळे गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण कामगिरी पाहून फ्रेंचायझी कारवाई करणार हे नक्की होतं. त्यात ऋषभ पंतने कर्णधारपदावरून मुक्त करण्याची मागणी केली आणि फ्रेंचायझीनी लगेच मान्यही केली. या पर्वात ऋषभ पंत केवळ कर्णधार म्हणूनच नाही, तर फलंदाज म्हणूनही अपयशी ठरला. आयपीएल 2026 मध्ये खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये पंतने 28.3 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा कमी स्ट्राइक रेटने फक्त 312 धावा केल्या. यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश होता. त्यामुळे त्याला आता संघात ठेवणार की रिलीज करणार हा देखील प्रश्न आहे. असं असताना ऋषभ पंतसारखंच चार कर्णधारांवर गच्छंतीची वेळ येणार आहे. चार संघांचे कर्णधार बदलले जाण्याची शक्यता आहे.
ऋषभ पंतनंतर पंतसोबतच हार्दिक पांड्यानेही मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्याचं बोललं जात आहे. पण अधिकृतरित्या यावर काहीच सांगितलं गेलं नाही. पण संघाची निराशाजनक कामगिरी पाहता तसा निर्णय होऊ शकतो. हार्दिक पांड्याने याबाबत फ्रँचायझीशी आधीच चर्चा केली असून, फ्रँचायझीनेही त्याचा निर्णय स्वीकारला आहे. मानसिक थकवा आणि दुखापत ही पांड्याच्या संघ सोडण्यामागील कारणे सांगितली जात आहेत. त्याच्यासोबतच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल, केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेन्नई सुपर किंग्सकडूनही ऋतुराज गायकवाडला कर्णधारपदावरून हटवण्याची शक्यता आहे.
अक्षर पटेल संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात अपयशी ठरला. इतकेच नाही तर, एक खेळाडू म्हणून अक्षरला केवळ 173 धावा करता आल्या आणि 19.22 च्या सरासरीने 11 बळी घेतले. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेच्या बाबतही तसंच आहे. . रहाणेने 14 सामन्यांमध्ये 25.76 च्या सरासरीने केवळ 335 धावा केल्या. रहाणेचे वय लक्षात घेता केकेआर पुढील हंगामात नवीन कर्णधाराची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची कामगिरीही खराब राहिली. ऋतुराज गायकवाडने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली नाही. 14 सामन्यांमध्ये 28.08 च्या सरासरीने केवळ 337 धावा केल्या.
