IND vs AUS: रोहित शर्मा महारेकॉर्डसाठी सज्ज, ठरणार विराटनंतरचा दुसराच भारतीय
Rohit Sharma India vs Australia Odi : रोहित शर्मा पर्थमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. रोहित यासह विराट कोहली याच्यानंतरचा पहिल आणि दुसरा सक्रीय भारतीय ठरेल.

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने करणार आहे. उभयसंघात 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. या मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सर्वांचा लाडका हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याच्यासाठी पहिला सामना ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा असणार आहे. रोहित या सामन्यासाठी मैदानातच उतरताच इतिहास रचणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात पर्थमध्ये होणारा सामना हा रोहित शर्मा याच्या कारकीर्दीतील 500 वा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे. रोहित यासह 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा टीम इंडियाचा पाचवा तर एकूण 11 वा खेळाडू ठरेल. मात्र हे सर्व रोहितला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? यावर अवलंबून असणार आहे.
आतापर्यंत टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविड या चौघांनी 500 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. तसेच विराट 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा टीम इंडियाचा एकमेव सक्रीय खेळाडू आहे.
टीम इंडियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू
- सचिन तेंडुलकर : 664 सामने
- विराट कोहली : 550 सामने
- महेंद्रसिंह धोनी : 535 सामने
- राहुल द्रविड : 504 सामने
रोहितची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
रोहितने आतापर्यंत टीम इंडियाचं 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रोहित कसोटी आणि टी 20i च्या तुलनेत एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक खेळला आहे. रोहित आतापर्यंत 273 वनडे मॅचेस खेळला आहे. तसेच हिटमॅनने 159 टी 20i आणि 67 कसोटी सामने खेळला आहे. रोहितने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
रोहितची कामिगरी
रोहितने 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 शतकांसह एकूण 19 हजार 700 धावा केल्या आहेत. विराटने कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 12, 32 आणि 5 शतकं झळकावली आहेत.
दरम्यान क्रिकेट विश्वात आतापर्यंत टीम इंडियाच्या चौघांशिवाय एकूण 6 खेळाडूंनी 500 सामने खेळले आहेत. श्रीलंकेकडून 3, पाकिस्तान,दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांकडून प्रत्येकी 1-1 खेळाडूने 500 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.
- महेला जयवर्धन : 652 सामने
- कुमार संगकारा : 594 सामने
- सनथ जयसूर्या : 586 सामने
- रिकी पॉन्टिंग : 560 सामने
- शाहिद आफ्रीदी : 524 सामने
- जॅक कॅलिस : 519 सामने
