Gautam Gambhir: प्रशिक्षक गौतम गंभीरचं पद अजूनही अडचणीत, का आणि कशासाठी ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर राहुल द्रविडने प्रशिक्षकपद सोडलं होतं. त्यानंतर ही धुरा गौतम गंभीरच्या हाती आली होती. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियात बरेच बदल झाले आणि दोन आयसीसी किताब जिंकले. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत टीम इंडियाचे चांगले दिवस आले. पण...

गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यापासून बऱ्याच चर्चा रंगल्या. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करेल का? वगैरे.. पण गौतम गंभीरने टीकाकारांची तोंड बंद केली. बीसीसीआयने गौतम गंभीरची नियुक्ती 2024 मध्ये केली होती. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत म्हणजेच तीन वर्षांसाठी हा करार असणार आहे. असं असताना जवळपास 2 वर्षांचा कालावधी संपत आला असून एक वर्ष शिल्लक राहिलं आहे. या कालावधीत गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने दोन आयसीसी जेतेपद मिळवले. त्यामुळे त्याची निवड योग्यच होती असं म्हंटलं जात आहे. कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय प्रशिक्षकाच्या नेतृत्वात दोन आयसीसी चषक मिळवण्यात यश आलं आहे. पण पुढे एका वर्षाच्या कालावधीत गौतम गंभीरचा कस लागणार आहे. कारण इतकं यश मिळवूनही त्याच्या पदावर गडांतर येण्याची शक्यता आहे.
गौतम गंभीरकडे टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या दरम्यान त्याने कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्ये बदल केले. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्याचे आकडे पाहता गंभीरला वनडे आणि टी20 क्रिकेट यश मिळालं आहे. कारण या दोन्ही फॉर्मेटमध्ये प्रत्येकी एक ट्रॉफी आली आहे. पण कसोटी फॉर्मेटमध्ये या उलट चित्र आहे. या फॉर्मेटमधील कामगिरी पाहता त्याचा कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे त्याच्या कसोटी फॉर्मेट कोचिंगवर गडांतर येण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने कसोटीत सुमार कामगिरी केली आहे. देशात झालेल्या कसोटी मालिकेत भारताने बांग्लादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. तर इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका ड्रॉ करण्यात यश मिळवलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दहा वर्षांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. इतकंच काय तर न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेने घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश दिला. न्यूझीलंडविरूद्धची मालिका गमावल्याने टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 खेळण्याचं स्वप्न भंगलं. या पराभवामुळे टीम इंडियाच्या जुन्या विक्रमाला धक्का बसला आहे. त्यामुळे गंभीर टीकाकारांच्या रडारवर आला आहे. जर येत्या काळात टीम इंडियाची कामगिरी कसोटीत हवी तशी झाली नाही तर त्याला या फॉर्मेटमधून डच्चू मिळू शकतो. बीसीसीआय स्प्लिट कोचिंगसारखं मोठं पाऊल उचलू शकते.
